नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
नियमांचे काटेकोरपणे पालन केले तर जगातून वर्षभरातच कोरोना हद्दपार होईल,असा दावा जागतिक आरोग्य संघटनेचे चे प्रमुख डॉ. टेड्रॉस अधानोम यांनी केला आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटनं जगभरात भितीचं वातावरण निर्माण केलं आहे. भारतात केल्या काही दिवसांमध्ये करोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. तिसरी लाट उंबरठ्यावर येऊन ठेपल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर हे कोरोनाचं संकट नेमकं कधी संपणार? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. निर्बंधांमुळे जसा अर्थव्यवस्थांना फटका बसलाय, तसाच तो नागरिकांच्या नियमित जीवनाला देखील बसला आहे. त्यामुळ सर्वच जण कोरोना जगातून हद्दपार होण्याची वाट पाहात असताना त्यावर जागतिक आरोग्य संघटनेचे चे प्रमुख डॉ. टेड्रॉस अधानोम यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
ओमायक्रॉन आणि वाढती रुग्णसंख्या यामुळे जगभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सर्वच देशांनी व्यापक प्रमाणावर लसीकरण सुरू केलं असलं, तरी अजूनही मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या फक्त एकच डोस झालेली किंवा लसीचे अजिबात डोस न घेतलेली आहे. त्यामुळे करोनाचा धोका अजूनही टळलेला नसताना जागतिक आरोग्य संघटनेकडून दिलासादायक भूमिका मांडण्यात आली आहे.
डॉ. टेड्रॉस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना कोरोना आणि लसीकरण याविषयी आपली भूमिका मांडली. आज जगातला एकही देश करोनाच्या प्रभावापासून सुरक्षित राहिलेला नाही. पण जमेची बाजू ही आहे की आज आपल्याकडे करोनाशी लढा देण्यासाठी अनेक साधनं उपलब्ध आहेत. तसेच, करोनावर उपचार करण्यासाठी देखील औषधं हाती आहेत. मात्र, जगात जितकी जास्त असमानता असेल, तेवढा हा विषाणू आपण कल्पनाही करू शकणार नाही किंवा बचाव करू शकणार नाही अशा पद्धतीने घातक होऊ शकतो अशी भिती डॉ. टेड्रॉस यांनी व्यक्त केली आहे.