शासकीय निधी वापरात अफरातफर केल्याचा आरोप
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
वाडगाव येथील रसायनी टेकडी येथील दत्तमंदिर यात्रा स्थळांच्या विकासाचा निधी वाडगांवमधील हनुमान मंदिर परिसरात पेव्हर ब्लॅकच्या बांधकामा वर्ग करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र कोणतेही काम करण्यात आले नाही, असा आरोप दत्त मंदिर ट्रस्ट अध्यक्ष, सदस्य व वाडगाव ग्रामस्थ यांनी केला असून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. शासकीय निधी वापरात अफरातफर करून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दत्त मंदिर ट्रस्टी, ग्रामस्थ मंडळी (वाडगांव, कुरुळ, वेश्वी, बेलकडे )यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, खासदार सुनील तटकरे यांच्या मार्फत जिल्हा नियोजन समितीच्या कोट्यातून रसायनी टेकडी येथील श्रीदत्त मंदिर यात्रा स्थळांचा विकास अंतर्गत निधी मंजूर केला होता. आरओ प्लांट बसवून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, या कामाच्या नावामध्ये परस्पर बदल करण्यात आला. वाडगाव येथील हनुमान मंदिर परिसरात भाविकांच्या वाहनांसाठी पेव्हर ब्लॉकचे बांधकाम करण्यासाठी निधी वर्ग करण्यात आला. कर्जत येथील बेरोजगार अभियंता, ठेकेदार शुभम नंदकुमार शिर्के यांच्या नावे काम मंजूर करण्यात आले. दहा लाख, 50 हजार रुपये ठेकेदाराला देण्यात आले असल्याचे त्यांना समजले.
दत्त मंदिर ट्रस्टच्या मागणीनुसार, हे काम दत्त मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी मंजूर झाले होते. दत्त मंदिराच्या विकासासाठी मंजूर झालेला निधी हनुमान मंदिर परिसरातील वर्ग करूनदेखील कोणतेही काम केले नाही. मात्र, लाखो रुपयांच्या निधीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. हनुमान मंदिर येथे देखील कोणतेही काम सद्यस्थितीत झालेले दिसत नाही. त्यामुळे या कामांची चौकशी करून तातडीने स्थळ पंचनामा करून भ्रष्टाचार करणाऱ्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ट्रस्ट अध्यक्ष, सदस्य आदींनी केली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, नेहा भोसले यांच्याकडे याबाबत मंगळवारी(दि.18) तक्रार अर्ज केले आहे.






