। पाताळगंगा । प्रतिनिधी ।
खालापुर तहसील कार्यालयातील आपले सरकार सेवा सेतू केंद्राच्या माध्यमातून दाखले व विविध प्रकारच्या सेवेचे शुल्क बेकायदेशीर पणे मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. या भ्रष्टाचार करणार्या सेतुचालकावर त्वरित फौजदारी कारवाई करावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुरेश गावडे यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. त्यांनी संबधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निवेदन तहसिलदार अभय चव्हाण यांना दिले आहे.
आपले सरकार सेवा केंद्राची प्रत्येक महिन्यास तपासणी केली जाते. मात्र, तहसीलदार कार्यालायाकडून तपासणी होतच नसल्याचे सिद्ध झाले आहे. कारण तपासणी होत असती तर संबंधित भ्रष्टाचार समोर उघड झाले असते. त्यामुळे सेतू केंद्राकडून चालकाला पाठीशी घातले जात असल्याचे सिद्ध होत आहे. या सर्व प्रकरणाची शासकीय नियमानुसार योग्य ती चौकशी करून लवकरात लवकर तालुक्यातील नागरिकांना न्याय मिळाला, यासाठी शासकीय स्तरावर गावडे यांनी निवेदन दिले आहे.







