कुडली जावटे परिसरात पिवळी फुले
| सुतारवाडी | वार्ताहर |
यावर्षी पावसाने वेळीच सुरुवात केली होती. मध्यंतरी मोठ्या प्रमाणावर पडत होता त्यामुळे बळीराजा धास्तावला होता. मात्र सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. सध्या कधी ऊन तर कधी तुरळक पाऊस पडत असल्यामुळे भात पिकाबरोबर भादव्या तिळाची सुंदर पिवळी फुल असलेली रोपं आता डोलायला लागली आहेत.
सुतारवाडी पंचक्रोशीमध्ये पावसाच्या पाण्यावर भात पिकं घेतली जातात. त्याचप्रमाणे कुडली, अंबिवली, जावटे, भाले या परिसरामध्ये थोड्या प्रमाणावर तिळ, नाचणी, वरी ची पिकं घेतली जातात. पावसाने परतीच्या प्रवासाचे संकेत दिल्याने भात पिकासह तिळाची पिकं चांगल्या प्रकारे डोलत आहेत. विविध परिसरात भात पिकाला लोंबी धारणा झाली असून आक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात भाताच्या लोंबी पक्व होतील.
पावसाने आता परतीचा प्रवास करणे आवश्यक आहे. त्यामुळे भात पिकांच्या लोब्या (कणसं) लवकरच पक्व होऊन ऑक्टोबर अखेर किंवा नोव्हेंबर महिन्यात पिंक कापण्यास योग्य होतील.
– बाळकृष्ण आयरे – शेतकरी