। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पाणीटंचाई ही भीषण समस्या होत चालली आहे. 2050 पर्यंत जागतिक स्तरावर पाच अब्जाहून अधिक लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाच्या एजन्सीने दिला आहे. हवामान बदलामुळे पूर आणि दुष्काळ यासारख्या पाण्याशी संबंधित धोक्यांचा जागतिक धोका वाढत असून पाणी टंचाईमुळे प्रभावित लोकांची संख्याही वाढण्याची अपेक्षा आहे, असं जागतिक हवामान संघटनेने सांगितलं.
द स्टेट ऑफ क्लायमेट सर्व्हिसेस 2020: वॉटर नावाच्या अहवालात नमूद केलेल्या आकडेवारीनुसार, 2018 मध्ये 3.6 अब्ज लोकांना दरवर्षी किमान एक महिना तरी पाण्याची अपुरी उपलब्धता होती. 2025 पर्यंत हे प्रमाण पाच अब्जांहून अधिक होण्याची अपेक्षा आहे. या अहवालात सहकारी पाणी व्यवस्थापन सुधारण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची गरज, एकात्मिक पाणी आणि हवामान धोरणे स्वीकारणे आणि शाश्वत विकास, हवामान बदलाशी जुळवून घेणे आणि आपत्ती जोखीम कमी करणे या सर्व गोष्टींमध्ये गुंतवणूक वाढवणे आवश्यक असल्याची गरज नमूद करण्यात आली आहे.
गेल्या 20 वर्षांत, स्थलीय पाण्याचा साठा
जमिनीच्या पृष्ठभागावरील सर्व पाण्याचा संचय, उपक्षेत्रातील मातीचा ओलावा आणि बर्फाचं प्रमाण दरवर्षी 1 सेंटीमीटर दराने घसरले आहे. अहवालानुसार, सर्वात जास्त नुकसान अंटार्क्टिका आणि ग्रीनलँडमध्ये होत आहे. परंतु अनेक उच्च लोकसंख्या असलेल्या आणि कमी अक्षांश असलेल्या ठिकाणी पारंपारिकपणे पाणीपुरवठा करणार्या भागात पाण्याचे लक्षणीय नुकसान होत आहे, त्यामुळे पाण्याच्या सुरक्षिततेवर मोठे परिणाम होत आहेत. पृथ्वीवरील केवळ 0.5 टक्के पाणी वापरण्यायोग्य आणि गोडे पाणी असल्यामुळे परिस्थिती बिकट होत आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये वारंवार पाण्याशी संबंधित धोके वाढले आहेत. 2000 सालापासून, पूर-संबंधित आपत्तींमध्ये त्यापुर्वीच्या दोन दशकांच्या तुलनेत तब्बल 134 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आशिया खंडात पूर-संबंधित मृत्यू आणि आर्थिक नुकसानीची मोठ्या प्रमाणात नोंद झाली आहे.
वाढत्या तापमानामुळे जागतिक आणि प्रादेशिक पर्जन्यमानात बदल होत आहेत, ज्यामुळे पावसाचे स्वरूप आणि कृषी हंगामात बदल होत आहेत. परिणामी अन्न सुरक्षा आणि मानवी आरोग्य तसेच कल्याणावर मोठा परिणाम होतो.
प्रा. पेट्टेरी तालस, जागतिक हवामान संघटनेचे सरचिटणीस







