| नेरळ | प्रतिनिधी |
समुद्रातील मासेमारी बंद झाल्यामुळे चिकन व मटण याचे भावदेखील वाढले आहेत. पाऊसदेखील काही दिवसांपूर्वी सुरु झाला आहे. अशावेळी नव्याने बाहेर पडणारे मुठे (चिंबोर्यांची एक जात) खवय्यांना आकर्षित करत आहेत. कोवळ्या गवतावर आणि पावसाच्या सुरुवातीलाच मिळणार्या पौष्टिक आणि चविष्ठ मुठ्यांना मागणी वाढत आहे.
पाऊस पडल्यावर हिरवळ उगवू लागते आणि ते हिरवळ चार म्हणून खाण्यासाठी वर्षातील आठ महिने बिळामध्ये लपून बसलेले मुठे बिळातून बाहेर येतात. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी हे मुठे बिळातून बाहेर येतात. तर, पाऊस पडत असल्यावर जास्त संख्यने मुठे चारा खाण्यासाठी बाहेर पडतात आणि त्या मुठयांना पकडले जाते. रात्रीच्या वेळी रिमझिम पाऊस पडू लागल्यावर मुठे पकडण्यासाठी खवये बाहेर पडतात. हातात गॅसबत्ती, टॉर्च किंवा जळता टायर घेतला जातो, सोबत मुठे ठेवण्यासाठी सिमेंटची पोती किंवा गोणपाट असतो. रात्रभर माळरान, शेत, गवताळ भाग किंवा डोंगर उतारावर फिरून मुठे पकडले जातात. बत्तीच्या किंवा टॉर्चच्या उजेडात हे मुठे थांबतात, मग आपण दबक्या पावलाने जाऊन त्यांना पकडून पोत्यात टाकले जाते. बर्याच वेळ फिरूनसुद्धा काही वेळेस मुठे हाती लागत नाही. त्यासाठी निसर्गाची साथ असावी लागते.
इतर खेकड्यांपेक्षा आकाराने लहान असलेल्या मुठ्यांचा रंग तजेलदार काळा व पिवळा असतो. पाठीचा भाग थोडा गोलाकार वर आलेला असतो. आकाराने लहान असले तरी त्याचे मांस चविष्ठ व आरोग्यवर्धक असते. मुठे वेगवेगळ्या प्रकारे आणि पद्धतीने बनवून खाल्ले जातात. त्यातील सर्वात प्रसिद्ध पद्धत म्हणजे मुठ्यांचे कवच काढून त्यामध्ये तांदूळ किंवा चण्याच्या पिठाचे मिश्रण भरले जाते. हे मिश्रण भरल्यावर धाग्याने पुन्हा कवच बांधून कालवण तयार केला जातो. हे भरलेलं मिश्रण चविष्ठ आणि लज्जतदार लागते. वाढते प्रदूषण, शहरीकरण व बांधकामे यामुळे मुठ्यांची निवासस्थाने नष्ट होत आहेत. तसेच पावसाचा अनियमितपणा या कारणामुळे प्रजोत्पादन कमी होऊन मुठ्यांची संख्या घटत आहे, अशी भीती खेकडे अभ्यासक नचिकेत घरत व्यक्त करतात.
डझनाला 100 रुपये भाव सध्या मुठ्यांचा बाजारभाव एक डझनला (12 मुठे) 100/- रुपये असल्यामुळे अनेक जण पकडणे पसंत करतात. मुठे विकून अनेकांच्या हातालादेखील दोन पैसे मिळतात.पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळणार्या या मुठ्यांवर खवये तुटून पडतात. मुंबई, पुणे आदी शहरांमध्ये राहणारे लोक गावाकडून हमखास मुठे नेतात किंवा आणायला सांगतात. पावसात उगवलेले कोवळे गवत तसेच शेतामध्ये पडलेले भाताचे दाणे खाण्यासाठी बाहेर पडतात. रात्रीच्या वेळीच रिमझिम पावसात हे मुठे आपल्या नांग्यांनी गवत तोडून बिळात नेऊन निवांतपणे खातात.