बोगस कामाची मनसे करणार पोलखोल
| आंबेत | वार्ताहर |
आंबेत बागमांडला राज्यमार्गावरील गडदाव ते मारियामखार या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु झाले असून, काम करीत असलेल्या कंपनीकडून अत्यंत चुकीच्या पद्धतीने काम होत असल्याची बाब उघड झाली आहे.
कामाची पद्धत आणि सुसूत्रता संबंधित कंपनी ही अभियंता प्लॅनिंगनुसार करत नसून, अनेक भागात मुख्य खडींवर मातीचा थर आणि मुख्य वापरात आणली जाणारी खडीचा वापर होत नसल्याने संपूर्ण लेयर हे चुकीच्या पद्धतीने होत असल्याची माहिती मनसेकडून उघड करण्यात आली आहे. संबांधित ठेकेदार मर्जीनुसार काम करत असून, भविष्यात रस्त्याची मजबुती धोक्यात येण्याची दाट संभावना वर्तविण्यात आली आहे. रस्ता रुंदीकरणासाठी चुकीचे खोदकाम, चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आलेली खडी, डांबरीचा कमी प्रमाणातील भाग हे सर्व काम सुरु असून, ठेकेदाराची काम लपटण्याची अति घाई कशासाठी, असा सवाल म्हसळा मनसे तालुका अध्यक्ष सौरभ गोरेगावकर यांनी उपस्थित केला आहे.
गडदाव ते मारियामखार या जवळजवळ 15 किमी अंतराचे सुरु असलेले रुंदीकरणाचे खोदकाम सहा ते आठ इंच तर काही ठिकाणी दहा इंच इतकेच खोदकाम नामधारी करत असून, या कामासाठी शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा चुराडा करून संपूर्ण पैसे गिळंकृत करण्याचे काम सदर ठेकेदार करत असल्याचा आरोपदेखील मनसेने केला आहे. या कामाकडे अधिकारी वर्ग का दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप स्थानिक नागरिक आता करत आहेत. सदर कामाची वरिष्ठ अधिकारीवर्गाने चौकशी करावी आणि संबंधित कंपनीला या कामाची मुख्य नियमावली समजून सांगावी अन्यथा बोगस काम सुरू असल्याबद्दल आंदोलन करावे लागेल, असा इशारादेखील सौरभ गोरेगावकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी वार्तालाप करताना व्यक्त केलं.
गडदाव ते मारियाम खार या 15 किमी अंतरावरील रस्ता रुंदीकरणाचे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. ठेकेदार अतिशय बारीक स्वरूपातील खडी सर्वात पहिल्या थराला वापरत असल्याने रस्त्याचा मजबुतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर ताबडतोब अधिकारी वर्गानी याकडे लक्ष देऊन योग्य पद्धतीने काम करून घेणे गरजेचे आहे.
सौरभ गोरेगावकर, म्हसळा मनसे तालुकाध्यक्ष