नवी मुंबईत दुपारच्या वेळेत संचारबंदी

सरासरी तापमान 40 अंश सेल्सिअस

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

नवी मुंबईत आता कडक उन्हाळा जाणवू लागला असून सद्यस्थितीत सरासरी तापमान 40 अंश सेल्सिअस इतके असते. त्यामुळे नवी मुंबईकरांची काहिली वाढली आहे. दुपारच्या वेळी अघोषित संचारबंदीचे चित्र आहे. रस्त्यावर शुकशुकाट दिसून येतो. अनियंत्रित बांधकामे, नवीन प्रकल्प, सिमेंट-काँक्रिटीकरण, विमानतळ विकास, औद्योगिकीकरण आणि पदोपदी तयार होत असलेले सिमेंटचे जंगल या कारणांमुळे मुंबईपेक्षा नवी मुंबईतील तापमान कमीत कमी दोन ते चार अंश सेल्सिअसने जास्त असल्याचे निदर्शनास येत आहे.

या शहराची निर्मिती करताना सिडकोने कमी निसर्गसंपदा निर्माण केल्याने ही काहिली अधिक वाढू लागली आहे. सिडकोनंतर शहराचे पालकत्व स्वीकारलेल्या पालिकेनेही हा प्रश्न अद्याप गांभीर्याने घेतलेला नाही, असा अनेक पर्यावरण संस्थांचा अभिप्राय आहे. ठाणे खाडीकिनाऱ्यावरील मिठागरांच्या जमिनींवर मातीचा भराव टाकून तयार करण्यात आलेल्या नवी मुंबईच्या जमिनीवर आता उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत.

महामुंबई क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. नवी मुंबई विमानतळासाठी मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले असून उलवा टेकडीची उंची आठ मीटरपर्यंत कमी करण्यात आली आहे. विमानतळाच्या धावपट्टीसाठी एक हजार हेक्टर क्षेत्रात सपाटीकरण करण्यात आले. त्यासाठी कोट्यवधी टन क्युबिक टन मातीचा भराव टाकण्यात आला. जेएनपीटी विस्तारासाठीही खारफुटी बुजवून सपाटीकरण करण्यात आले आहे. ठाणे-बेलापूर, शीव-पनवेल आणि नवी मुंबई-उरण महामार्गाचे सिमेंट-काँक्रिटीकरण करण्यात आले. या सगळ्याचा परिणाम म्हणून तापमान पूर्वीपेक्षा वाढले आहे, असे तज्ज्ञ सांगतात.

आरोग्य धोक्यात
सायंकाळी आणि रात्रीदेखील हवा गरम असते. त्यामुळे यंदाचा उकाडा नवी मुंबईकरांना त्रासदायक ठरत आहे. ताप, घसादुखी, पोटदुखीचा त्रास होणारे रुग्ण वाढल्याचे खासगी, तसेच पालिकेचे डॉक्टर सांगत आहेत.

सील बंद पाण्याला मागणी
उन्हात अनेक जण आरोग्यांची काळजी घेताना मिनरल वॉटर विकत घेतात. सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या पाणपोईंच्या ठिकाणी पाण्यासाठी असणारी फिल्टर मशिन किंवा थंड पाणी मिळत नसल्यामुळे अनेक जण मिनरल वॉटर घेऊन आपली तहान भागवत आहेत. त्यामुळे मिनरल वॉटरला मोठी मागणी आहे.

Exit mobile version