पोलादपूरमध्ये आंबा बागायतदार आणि घर गोठयांचे नुकसान

अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे सुट्टयांमुळे रखडले
पोलादपूर । वार्ताहर ।
तालुक्यातील ग्रामीण भागात गुरूवारी सकाळी पाऊस पडल्यानंतर शुक्रवारी सायंकाळनंतर सोसाटयाच्या वादळी वाऱ्यासह पाऊस पडून आंबा बागायतदार शेतकरी आणि घरे तसेच गोठयांचे नुकसान झाल्याची माहिती प्राप्त होत आहे. मात्र, महसूल विभागाला विकएण्डच्या सलग सुट्टया असल्याने या नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे रखडले असून सोमवारनंतर या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाला राज्यसरकारकडून झाल्यास तालुक्यातही पंचनामे सुरू केले जातील, असा अंदाज वर्तविला जात आहे.
गुरूवारी सकाळी आभाळ भरल्यानंतर अर्धा तास पावसाने शिडकावा केला असताना शुक्रवारी सायंकाळी पुन्हा आभाळ दाटून आले आणि जोरदार सोसाटयाचे वारे वाहू लागून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. यावेळी महावितरणने विद्युतपुरवठा खंडित ठेवल्याने ग्रामीण भागात हानीचा अंदाज घेण्यास आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी प्रयत्न केल्यानंतर रस्त्यावर आंब्यांचा कैऱ्यांचा सडा पडल्याचे प्रकाश झोतामध्ये दिसून आले. मात्र, शनिवारी दिवसा आंबा बागायतीकडे लक्ष टाकले असता शेतकऱ्यांना आंब्याच्या झाडांच्या फांद्या तुटून अनेक झाडांची हानी झाली असून असंख्य आंबे व कैऱ्यांचा खच झाडाखाली गळून पडल्याने नवी मुंबई वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत आंब्यांची विक्री करण्याआधीच झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्याची मेहनत वाया गेल्याचे दिसून आले.
पोलादपूर तालुक्यातील दाभिळ येथील तात्याबा दळवी या शेतकऱ्याचे सुमारे पाऊण लाखांचे नुकसान या अवकाळी पावसाने केले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्यात कृषी अधिकारी कार्यालयामार्फत फळपिक विमा मोबदला देणाऱ्या कंपन्यांनी तातडीने त्यांचे एजंट पाठवून झालेल्या अवकाळी नुकसानीचा विमा देण्याची व्यवस्था करण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, शाळागृह, अंगणवाडया तसेच अन्य सार्वजनिक इमारती तसेच शेतकऱ्यांची घरे व गोठयांचेही मोठया संख्येने नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र, या संदर्भात अधिकृत सरकारी आकडेवारी प्राप्त होण्यासाठी सोमवारी महसूल आणि कृषी विभागामार्फत पंचनामे होण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

Exit mobile version