स्वाती पेशवे
डॉ. अनिल अवचट हे नाव अनेक क्षेत्रांशी संबंधित होतं. साहित्य, कला, सामाजिक कार्य आदी महत्त्वपूर्ण प्रांगणांमध्ये मुक्त संचार करणारं आणि आपल्या संपर्कात येणार्यांमध्ये विवेकी विचारांची पेरणी करणारं हे नाव आता काळाच्या पडद्याआड गेलं आहे. पण व्यक्ती गेली तरी विचार जिवंत असतात. याच न्यायानं त्यांची व्यसनमुक्तीची चळवळ, उङ्ख अभिरुची आणि संवेदनशीलता अनेकांच्या आयुष्याला आकार देईल हे नक्की.
साहित्य, लेखन, सामाजिक काम, हस्तकला, चित्ररेखाटन, व्यसनग्रस्तांसाठी दिशादर्शनाचं काम अशा एक ना अनेक माध्यमातून आपल्याला ज्ञात असणारे डॉ. अनिल अवचट नावाचं एक गारुड आता शांत झालं आहे. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रांचे संस्थापक या ओळखीबरोबरच त्यांनी विविध कामाद्वारे निर्माण केलेली ओळख पुढील अनेक वर्षे कायम राहणार असली तरी त्यांच्यारुपानं समाजातलं एक जाणतं आणि तळमळ असणारं व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड केलं आहे. त्यांनी कळत-नकळत अनेक कार्यकर्ते घडवले जे आज त्यांचाच वसा पुढे चालवत आहेत. त्यांच्या कामाची धूरा खंबीरपणे सांभाळत आहेत. अर्थात असं असलं तरी यापुढे त्यांची जागा रिकामी बघावी लागणं ही अत्यंत दु:खद बाब आहे.
डॉ. अवचट खेड्यात लहानाचे मोठे झाले. दहावीपर्यंत गावातील शाळेत शिकून 1958 मध्ये ते पुण्यात आले. त्यामुळे खेडं आणि शहर या दोन्ही भागांमधील जीवनशैलीचे ते साक्षीदार होते. शिवाय या जीवनशैलीत अलिकडच्या काळात होणारे बदलही ते बारकाईने अभ्यासत होते. या अभ्यासात जाणवलेली महत्त्वाची बाब म्हणजे पूर्वी कधी पाहिली नाही अशी निसर्गाची पडझड आपण अनुभवत गेलो, असं ते सांगत असत. हजारो वर्षांचा इतिहास पाहता वेळोवेळी निसर्गाचा र्हास झाल्याचे, अनेक सजिवांच्या जाती-प्रजाती नामशेष झाल्याचे, पर्यावरणीय असंतुलन निर्माण झाल्याचे अनेक दाखले मिळतात पण गेल्या दोन-तीन दशकांमध्ये हा आलेख झपाट्यानं वर गेलेला दिसतो हे ते गांभीर्यानं सांगत असत. असंतुलन निर्माण होण्याचा इतका भयावह वेग पूर्वी कधीच अनुभवायला मिळाला नव्हता. या वेगाने मानवी भावभावनांवरही कब्जा मिळवला आहे. म्हणूनच मी बदलत्या संवेदनांचाही साक्षीदार आहे, हे त्यांचे शब्द अजूनही कानात आहेत.
डॉ. अवचट हे गावाकडच्या गप्पांमध्ये रमणारं व्यक्तिमत्त्व होतं. मनमोकळ्या गप्पांदरम्यान एकदा ते म्हणाले होते, ‘आमच्याकडे शेतात एक गडी होता. कणसात दाणे भरले आणि ती टिपायला पाखरं आली की तो गोफणीतून दगड उडवून त्यांना हाकलून लावायचा. एकदा मीही गोफण घेतली आणि पाखरं उडवायला लागलो. तेव्हा तो म्हणाला, ‘फार जोर करु नको, काही वाटा पाखराचा बी असतो…’ याला म्हणतात संवेदना! आमच्या गोठ्यात बरीच जनावरं होती. त्यातील कल्याणी नावाची म्हैस गेली. आईनं ही बातमी सांगितली आणि तिला शेतातच पुरल्याचंही सांगितलं. त्यावर मी विचारलं, ढोराकडून तिचं कातडं काढून घेतलं नाही का? ती उत्तरली, ‘माझी मुलं कल्याणीच्या दुधावरच वाढली आहेत. एका अर्थी ती त्यांची आईच होती. मग आईशी कोणी असं वागतं का?’ तिच्या उत्तराने मला चूक उमगली होती. बदलत्या काळात ही संवेदनशीलता हरवताना दिसत आहे. ऋणानुबंध सैल होताहेत, नाती शुष्क होत आहेत. आता शेती ही फॅक्टरी आणि जनावरं ही मशीन आहेत. ‘यूज अँड थ्रो’ च्या या जमान्यात गरज संपली की फेकून देणं हा नियम बनतो आहे. ही परिस्थिती बदलायला हवी.’ अवचट सरांचे हे विचार त्यांची संवेदनशीलता दाखवून देण्यास पुरेसे ठरावेत.
एकदा त्यांनी सांगितलं होतं, ‘आमच्या गावी मांडवी नावाची नदी आहे. पूर्वी ती बारमाही वहायची. तुडुंब भरलेली नदी खूप छान दिसायची. या नदीभोवती एक गूढता आणि वलय होतं. नदीच्या डोहात डुंबताना ते कायम जाणवायचं. पण नंतर वरच्या बाजूला धरण झालं आणि नदीचं पाणी गेलं. आता धरणातून पाणी सोडलं तरच नदी वाहते. एरवी पात्रात साठलेल्या पाण्यात डास-माशांची उत्पत्ती होते. हा परिसर दुर्गंधीने भरुन जातो. ही परिस्थिती जागोजागी पहायला मिळते. नद्यांवर धरणं बांधली गेली. एक प्रकारे शहरांसाठी पाण्याच्या टाक्या उभ्या राहिल्या.
वरसगाव, वैतरणा, भातसा, जायकवाडी, उजनी सार ‘या धरणांमुळे मोठ्या शहरांची तहान भागली पण ग्रामीण भाग तहानलेलाच राहिला. परिणामी, ग्रामीण भागातील जनता शहरांकडे धावली आणि शहरांचा अनियोजित विस्तार झाला. आज आपण या समतोलाचे बळी ठरत आहोत.’ हे बोलताना त्यांच्या मनाची तगमग स्पष्टपणे जाणवू शकेल अशी होती.
आधुनिकता आणि चुकीच्या दिशेनं वाहणारं बदलाचं वार याबाबत कायमचे ते पोटतिडकीनं बोलायचे. त्यावर अभ्यासपूर्ण भाष्य करायचे. ते म्हणायचे. ‘पूर्वी कधीच बियाणं विकत घेतली जायची नाहीत. पाखडणी करताना आधी जड धान्य खाली पडतं. हा दाणा पुढच्या वर्षीसाठी राखून ठेवला जायचा. पूर्वी बळदं असायची. हे जड धान्य बळदात ठेवायचं, नंतर बळद बंद करुन शेणानं सारवायचं आणि त्यावर रांगोळी काढायची. हे धान्य वापरायचं नाही. हीच प्रचलित पद्धत असल्यानं पूर्वी कधीच बियाणं खरेदी करायची वेळ यायची नाही. पण काळ बदलला. जास्त उत्पादन देणारी बियाणी बाजारात मिळू लागली. त्यावर नवनवीन प्रयोग झाले. त्यामुळे मूळ स्वरुपात काही अंशी बदल झाला.
पिकांवर कीड पडत असली तरी पाठोपाठ त्यांचे नैसर्गिक शत्रूही येतात. हे जीव त्यांना भक्ष्य बनवतात. ही जीवनसाखळीच आहे. पिकांवर पडलेल्या अळ्या खाण्यासाठी पक्षी अथवा चतूरसारखे कीटक येतातच. ही निसर्गाची सफाई मोहीम असते पण तीव्र कीटनाशकांचा वापर सुरू झाला आणि निसर्गाची ही साखळी तुटली. आता विषारी कीटकनाशकांची फवारणी केली जाते पण ही विषारी रसायनं जमिनीत, जमिनीतून गवतात, गवतातून गायी- म्हशींच्या दुधात आणि दुधातून माणसांच्या अन्नचक्रात येतात. यामुळे अनेक रोगांचं प्राबल्य वाढल्याचं पहायला मिळतं. पूर्वी कर्करोगासारखे आजार अभावानं पहायला मिळायचे. आता मात्र ते सर्रास पहायला मिळतात. आतापर्यंतच्या प्रवासात अनुभवलेलं हे एक धोकादायक वळण आहे. म्हणूनच आता चालना मिळालेलं ऑर्गेनिक फार्मिंगचं लोण झपाट्यानं सर्वदूर पसरायला हवं.’
त्यांना अपेक्षित असलेली विकासाची व्याख्या अत्यंत समतोल आणि निसर्गाचा तोल सांभाळणारी होती. याविषयावरील त्यांचे विचारही स्पष्ट होते. ते म्हणायचे, ‘यंत्र आणि तंत्रयुग अवतरल्यानंतर गरिबी, कुपोषण, निरक्षरता कमी होणं अपेक्षित होतं. गरीबांच्या तोंडात दोन वेळा अन्नाचा घास पडण्याची अपेक्षा होती. आपण स्वतंत्र झालो तेव्हा तर या अपेक्षेला वेगळीच धार होती. पण असं काहीच घडलं नाही. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर बाँब बनवण्यासाठी अधिक झाला. औषधं तयार झाली पण आजही गरीब उपचाराविना मरत आहेत. या वर्गासाठी चांगले दवाखाने नाहीत, दवाखाने आहेत तर पुरेसे डॉक्टर नाहीत, खेडेगावात शिक्षणाची चांगली सोय नाही. भारतातील 60 ते 70 टक्के जनता गरीब असताना ही परिस्थिती काळजी वाढवणारी आहे.’
वाढती व्यसनाधिनता हा तर त्यांच्या बोलण्यात वारंवार डोकावणारा विषय असे. कित्येक वर्षे व्यसनमुक्तीच्या कामात झोकून दिल्यामुळे ते यावर अत्यंत कळकळीने म्हणायचे,‘ पूर्वी गावात दोन- चार माणसं दारु प्यायची. आता पित नाहीत अशी दोन- चार माणसं उरली असतील! दारूच्या नशेत चालणार्या माणसाला वाटेत एखादा सान माणूस दिसला की तो रस्ता बदलायचा. आता सान माणसांना रस्ता बदलावा लागतो. समोर ज्येष्ठ व्यक्ती दिसताच हातातील विड्या विझवल्या अथवा दडवल्या जायच्या पण आता हा धाक आणि दरारा कुठेच राहिलेला नाही. स्पष्टपणे जाणवणारे हे बदल विषण्ण करणारे आहेत.’
गॅझेट्च्या आहारी जाऊन हे व्यसन जडलेले तरुण पाहून त्यांचं मन कातर होत असे. आमच्या ‘मुक्तांगण’ या व्यसनमुक्ती केंद्रात आता सायबर अॅडियटही उपचार घेत आहेत. या व्यसनींना आपण व्यसनाच्या आहारी जात आहोत आणि ही बाब चुकीची आहे हे समजतंय पण यापासून दूर जाण्याचे मार्ग त्यांच्याकडे नाहीत असं ते सांगत असतं.
यंत्रांनी माणसांवर कब्जा करावा यासारखं दुर्दैव ते कोणतं? हा त्यांचा हृदयाला हात घालणारा प्रश्न असायचा. निसर्ग माणसाच्या गरजा भागवण्यासाठी समर्थ आहे, स्वार्थ भागवण्यासाठी नाही… हे त्यांचं म्हणणं होतं. असे परखड आणि स्पष्ट, भरकटलेल्यांना योग्य पथावर आणणारे त्यांचे विचार हीच त्यांनी मागे ठेवलेली मोठी संपत्ती आहे. या विचारांचा पाठपुरावा करणं आणि त्यांच्या कार्याच्या पखाली वाहणारे खांदे सशक्त करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.