| पनवेल | प्रतिनिधी |
खारघर, कामोठे आणि तळोजा या उपनगरांमध्ये तीव्र झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेने सर्व प्रभागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर नितीन पाटील यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान अनेक रहिवाशांनी पाणी प्रश्न भेडसावण्याच्या समस्येकडे लक्ष्य वेधले.
त्यानंतर महापौरांनी महापालिका प्रशासनाला तातडीच्या सूचना देत पिण्याच्या पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी आपत्कालीन आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. खारघर, कामोठे आणि तळोजा परिसरातील नागरिकांना सध्या पिण्याच्या पाण्याची मोठी कमतरता भासत आहे. महापौरांच्या दौऱ्यादरम्यान नागरिकांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.
या मागण्यांची दखल घेत महापौरांनी स्पष्ट केले की, सिडको महामंडळाकडून पाणीपुरवठा सेवा हस्तांतरण झाले नसले तरी नागरिकांना पाणी देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे ज्या प्रभागांमध्ये पाणीटंचाई आहे, तेथे तात्काळ पाहणी करून संबंधित गृहनिर्माण संस्थांना टँकरने पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश देण्यात आले.
या दरम्यान नागरिकांचे पाणी हाल टाळण्यासाठी महापौरांच्या सूचनेनंतर 1 एप्रिलपासून प्रत्येक प्रभागात दोन टँकर राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, पाणीपुरवठा विभागात अतिरिक्त मनुष्यबळ नेमून स्वतंत्र पथक तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र मोबाइल क्रमांक देऊन (न बदलणारे) तक्रारींचे नोंद व तत्काळ निराकरण केले जाईल. सुरुवातीला दिवसा सेवा सुरू करून नागरिकांच्या प्रतिसादानुसार ती 24 तास सुरू ठेवण्याचा विचार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.
पनवेल महापालिकेतील पाणी समस्या मुळापासून दूर करण्यासाठी आमचे प्रयत्न जोरदारपणे सुरू आहेत. त्याचे तात्काळ परिणाम दिसत नसले तरी दीर्घकालीन पाणी दिलासा नक्कीच मिळेल. प्रत्येक वसाहतीमध्ये पाणी समस्या निर्माण झाल्यास त्या तक्रारींचे तातडीने निवारण करावे आणि गरज भासल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, यासाठी स्वतंत्र पाणी पथक स्थापन करून कार्यवाही करण्याची सूचना महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत.
नितीन पाटील,
महापौर, पनवेल महापालिका





