पितृ पक्षात घरोघरी केले जाते आवाहन
| उरण | प्रतिनिधी |
हिंदू धर्मात पितृ पक्षाला महत्वाचे स्थान आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पितृ पक्षात पूर्वजांचे स्मरण करून त्यांना नैवैद्य अर्पण केला जातो. घरावर किंवा टेरेसवर अन्न किंवा नैवेद्य ठेवले जाते. यासाठी कावळा या पक्षाला अन्न ग्रहण करण्यासाठी बोलाविले जाते. याला अनेक ठिकाणी काव… काव.. असेही म्हणतात. अनंत चतुर्दशीनंतर पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी कृष्ण पक्ष सुरू होतो. भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून भाद्रपद अमावस्येपर्यंतच्या काळाला हिंदू धर्मातील महत्त्वाचा पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा म्हणतात.
पितृपक्ष आणि कावळे यांचे समीकरण, नाते रूढ आहे, ऐरवी कावळ्याला कधीही जवळ न करणारेदेखील पितृपक्षात काव…काव..करत असतात. यंदा मात्र पितृपक्ष अर्ध्या अधिक संपला, तरी कावकाव फारशी कानावर येत नसल्याचे दिसते. आपल्या पूर्वजांसाठी ठेवलेला नैवेद्य किंवा पिंडाला स्पर्श करण्यासाठी देखील कावळा दिसत नसल्याने यंदा कावळे गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यमदूताचे प्रतीक मानले जात असलेल्या कावळ्याला पितृपक्षात विशेष महत्त्व असते. पूर्वजांचे प्रतिनिधित्व करणारा हा पक्षी ऐरवी अशुभ मानला जात असला, तरी पितृपक्षात कावळ्याला अन्न देणे हे शुभ मानले जाते, जे पितरांना तृप्त करते आणि त्यांना मोक्ष मिळवून देते, अशी धारणा आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत अन्य वन्यजीवांप्रमाणेच कावळ्यांची संख्याही झपाट्याने कमी होताना दिसत आहे. ग्रामीण भागात कावळे दिसत असले, तरी शहरी भागातील त्यांची संख्या कमी होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पर्यावरणात झपाट्याने होत असलेल्या बदलामुळे अनेक वन्यजीव पशुपक्षी नष्ट झाले असून, येऱ्या काळात अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. याबद्दल प्राणीप्रेमी व पर्यावरण प्रेमीनी चिंता व्यक्त केली आहे.
पशु पक्षी नामशेष होण्याच्या संदर्भात प्राणी मित्र तथा केअर ऑफ नेचरचे संस्थापक राजु मुंबईकर यांच्याशी संपर्क साधले असता त्यांनी सांगितले की, शहरी भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. औद्योगीकिकरण सूरु आहे. त्यामुळे झाडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. वनतोड मोठया प्रमाणात होत आहे. पर्यायी वनांची निर्मिती होत नसल्याने कावळ्यांसह अन्य पशुपक्ष्यांची निवारास्थाने नष्ट होत आहेत. त्याचबरोबर मोबाईल टॉवरच्या रेडिएशनचा परिणाम पक्ष्यांवर होत असून, रेडिएशनच्या तीव्रतेचा फटका चिमण्यांइतकाच कावळ्यांनाही बसत आहे. त्यामुळे अन्य पशुपक्ष्यांप्रमाणेच कावळ्यांची संख्यादेखील झपाट्याने कमी होऊ लागली आहे. यावर वेळीच उपाय न केल्यास भविष्यात कावळ्यांची केवळ छायाचित्रेच दिसतील, आपल्याला कावळा फक्त मोबाईल, टीव्ही पुस्तक व वृत्तपत्रात दिसतील मात्र प्रत्यक्ष कावळा शोधूनही सापडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
उंदीर व लहान प्राण्यांना विष टाकून मारण्यात येते. कावळे हे उंदीर खाऊन विष त्यांच्या शरीरात तसेच राहते. कावळे हे उंदीर खात असल्यामुळे कावळ्यांचा विषारी रसायनामुळे मृत्यू होतो. या बाबीवर वेळीच लक्ष देऊन घातक रसायनवर बंदी घातली पाहिजे. जेणेकरून विविध पशु- पक्षी यांच्या जीवितेला धोका पोहोचणार नाही.
राजू मुंबईकर,
संस्थापक अध्यक्ष
केअर ऑफ नेचर संस्था, पक्षीमित्र







