| तळा | वार्ताहर |
तळा शहरातील मोदी तलावाची गाळ काढून स्वच्छता करण्याची मागणी शहरवासियांकडून केली जात आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या तलावाची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. तलावात मोठ्या प्रमाणावर गाळ जमा झाला असून, आजूबाजूला राहणार्या नागरिकांच्या घराचे सांडपाणी थेट तलावात सोडण्यात आले असल्याने तलावातील पाण्याचा उग्र वास येत असतो.
शहरातील संत रोहिदास नगर, बाजारपेठ, परीट आळी, सुतार आळी आदी गावांतील घरगुती गणपतींचे विसर्जन या तलावात केले जात असल्याने दरवर्षी विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना या उग्र वासाचा त्रास सहन करावा लागतो. तसेच दुर्गंधीयुक्त दूषित पाण्यात विसर्जनासाठी उतरलेल्या गणेशभक्तांना यामुळे त्वचेचे विकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने या तलावातील पाण्याची पातळी बहुतांश कमी झाली आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीच मोदी तलावातील गाळ काढून पूर्णतः तलावाची स्वच्छता करावी जेणेकरून गणेशोत्सव काळात भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.