| नेरळ । वार्ताहर ।
मध्य रेल्वेवरील कर्जत एन्डकडील भिवपुरी रोड या स्थानकात उपनगरीय लोकल या थांबतात. त्याच्या आजूबाजूला देखील सायडिंग मार्गिका असल्याने बहुतेक प्रवासी हे रेल्वे मार्गिका रूळ ओलांड़ून बाहेर पडतात. त्यावेळी अपघात होत असतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या स्थानकात पादचारी पूल उभारले आहेत, पण तरी देखील प्रवासी रूळ ओलांडूनच ये जा मारीत असतात. दरम्यान, सतत होणारे अपघात टाळण्यासाठी भिवपुरी रोड स्थानकातील प्रवासी संघटना यांच्या मागणी नंतर आता संरक्षण जाळी बनविण्यात येत आहे. त्यात स्थानकातील दोन्ही कडील रुळांवर अनेकदा मालवाहू गाडी उभी असते आणि त्यामुळे प्रवाशांना त्या रुळावर उभ्या असलेल्या मालवाहू गाडीमधून वाट काढत जायला लागायचे,परिणामी अनेक प्रवाशांना रूळ ओलांडताना आपले जीव गमवावे लागले आहेत. दरम्यान,स्थानिक प्रवासी यांचे जीवन महत्वाचे असल्याने स्थानकात लोखंडी रेलिंग करण्यात यावे अशी मागणी भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात प्रवासी संघटना यांनी सातत्याने मागणी केली होती. त्यानुसार गतवर्षी कर्जत एन्ड कडील भागात लोखंडी रेलिंग बसवून घेण्यात आले होते. आता मुंबई एन्ड कडील भागाला लागून असलेले चिंचवली गाव आणि तेथील लोकवस्ती लक्षात घेऊन त्या भागात देखील लोखंडी रेलिंग बसविण्याचे मागणी केली जात आहे.