| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग-रेवदंडा मार्गावरील नागाव येथील रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तरीदेखील एसटी बससेवा या मार्गावरून सुरु झाली नाही. त्याचा फटका या मार्गावरील प्रवाशांना बसत आहे. नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांनी नुकतीच अलिबाग एसटी बस आगार व्यवस्थापक यांची भेट घेऊन नागावमार्गे एसटी बससेवा पूर्ववत सुरु करावी, अशी मागणी केली. यावेळी त्यांनी स्थानक प्रमुखांकडे निवेदन दिले.
अलिबाग-रेवदंडा मार्गावरील रायवाडीमधील 400 मीटरच्या काँक्रिटीकरणाचे काम गेल्या महिन्याभरापासून सुुरू होते. त्यामुळे सहाण बायपासमार्गे वाहतूक वळविण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेले हे काम पूर्ण होऊन अनेक दिवस उलटून गेले आहेत. तरीदेखील हा रस्ता एसटी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही. नागाव ग्रामपंचायत हद्दीतील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी व ग्रामस्थ कामानिमित्त एसटी बसच्या माध्यमातून प्रवास करतात. परंतु, रस्त्याचे काम सुरु असल्याने पाल्हे बायपास रस्त्याने वाहतूक वळवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. प्रलंबित असलेले रायवाडी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तरीदेखील एसटी बससेवा सुरु करण्यात आली नाही. एसटी बस वाहतुकीसाठी नागावमार्गे रस्ता खुला करण्यात यावा, अशी मागणी हर्षदा मयेकर व निखील मयेकर यांनी केली आहे. विद्यार्थी व ग्रामस्थांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी नागावमार्गे बसेस तातडीने सुरु करण्याचे निर्देश देण्यात यावेत, असे हर्षदा मयेकर यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले.