देशातील लोकशाही, पुरोगामी विचार धोक्यात

| कोल्हापूर | प्रतिनिधी |

देशातील परिस्थिती पाहता घटना लोकशाही, पुरोगामी विचार धोक्यात आले आहेत. कोल्हापूरची पुरोगामी विचारधारा वाढीस लागण्यासाठी शाहू महाराज यांना संसदेत पाठवावे, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले. कोल्हापुरातील काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ फुलेवाडी येथे जाहीर सभा घेण्यात आली.

ही निवडणूक देशाच्या भवितव्याची आणि लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे आपण सर्वांनी इंडिया आघाडीच्या व काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी समवेत व्यासपीठावर कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज, आमदार पी. एन. पाटील आदींसह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार थोरात म्हणाले, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था बळकट केली. मोदी सत्तेत आल्यानंतर जातीभेद वाढला. देशाची लोकशाही, राज्यघटना, मताचा अधिकार संकटात आहे. ते टिकवण्यासाठी परिवर्तन गरजेचे आहे. शाहू छत्रपती यांना मत म्हणजे राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांना मत आहे. उमेदवार शाहू महाराज म्हणाले, कोल्हापूरला मुबलक पाणी, रंकाळा संवर्धन, महिलांना न्याय, तरुणांना रोजगार अशा बाबींवर निवडणूक लढवत आहोत. लोकांना हवे असलेले परिवर्तन या निवडणुकीत झाल्याशिवाय राहणार नाही.

आ. सतेज पाटील यांनी श्रीमंत शाहू महाराजांच्या रुपाने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांचा विचार दिल्लीत जाणार आहे. विरोधी उमेदवाराने पाच वर्षांत काय काम केलं, किती लोकांच्या भेटी घेतल्या, किती निधी आणला हे त्यांनी सांगावे, असे आव्हान त्यांनी दिले. आमदार ऋतुराज पाटील यांनी शाहू महाराज ही आपली अस्मिता असल्याने ती जपण्याचे काम कोल्हापूरकर करतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Exit mobile version