मराठी लोकांना नोकरी नाकारणं दुर्दैवीः रोहित पवार

। बारामती । प्रतिनिधी ।

मुंबईतील गुजराती माणसाचा आत्मविश्‍वास हा सध्या वाढला आहे. कारण त्यांना माहिती आहे की, येथील राजकारणी आपल्या पाठिशी आहेत. याच आत्मविश्‍वासातून दक्षिण मुंबईत मराठी माणसांना नोकरी नाकारण्यात आल्याचा प्रकार घडला. ही घटना दुर्दैवी आहे, असे मत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. ते सोमवारी बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सध्या मुंबईत सुरु असलेल्या मराठी विरुद्ध गुजराती वादावर भाष्य केले.

सध्या गुजराती नेत्यांचा आत्मविश्‍वास आणि अहंकार वाढला आहे. वरुन एक आदेश आला की, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जातात. त्यामुळे गुजराती नेत्यांचा अहंकार वाढला आहे. त्यामधूनच गुजराती कंपन्यांकडून मराठी माणसांना नोकरी नाकारण्याचे प्रकार घडत आहेत. हे असे होत असेल तर मराठी लोकांची ताकद दाखवून द्यावी लागेल, असे रोहित पवार यांनी म्हटले.

मराठी संस्कृतीचा ध्वज दिमाखात मिरवणार्‍या मुंबईच्या गिरगाव परिसरातील एका नोकरीसाठी देण्यात आलेल्या जाहिरातीवरुन सध्या सोशल मीडियावर वाद सुरु आहे. गिरगाव परिसरात असणार्‍या या नोकरीसाठी ‘मराठी उमेदवारांनी अर्ज करु नयेत’, अशी खास सूचना जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आली होती. लिंक्डीन या व्यासपीठावरील या जाहिरातीचे स्क्रीनशॉटस् व्हायरल झाल्यानंतर मराठी भाषिकांमध्ये एकच संतापाची लाट उसळली होती.

Exit mobile version