15 जिल्ह्यातील रुग्ण 100 च्या आत
| मुंबई | प्रतिनिधी |
कोरोनाच्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात कमी झाला असून, कोरोनाला उतरती कळा लागल्याचे चित्र दिसत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील आकडेवारी सकारात्मक आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णाची संख्या कमी होऊन 53 हजारांवर आली आहे. राज्यातील 15 जिल्ह्यात 100 पेक्षा कमी उपचाराधीन रुग्ण आहेत. नंदुरबारमध्ये तर एकही कोरोनाचा रुग्ण नाही. रुग्णसंख्या नियंत्रणात दिसत असली तरी नवे बाधित रुग्ण पूर्णपणे संपलेले नाहीत. येणार्या नवीन रुग्णांमध्ये अनेक रुग्ण रुग्णालयात उशिरा दाखल होतात. राज्यातील एकूण उपचाराधीन रुग्णांपैकी 37 हजार रुग्ण पाच जिल्ह्यातील आहेत. या पाच जिल्ह्यांमध्ये पुणे, ठाणे, सातारा, अहमदनगर आणि सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये सरासरी तीन हजारांपेक्षा जास्त उपचाराधीन रुग्णांची नोंद आहे.
100 रुग्णांच्या आतील जिल्हे
जळगाव, नंदुरबार, धुळे, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
पाच जिल्ह्यात मृत्यू नाही
राज्यातील मृत्यूदर आटोक्यात आलेला नाही. असे असतानाच महिनाभरापासून धुळे, नंदुरबार, जळगाव, हिंगोली आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांत एकाही मृत्यूची नोंद नाही.
लसीकरणात महाराष्ट्राचा विक्रम
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणमध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करीत 10 लाख 96 हजार नागरिकांना लस देण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. एकाच दिवशी सुमारे 11 लाखाच्या आसपास नागरिकांना लसीकरण करून आरोग्य विभागाने अतुलनीय कामगिरी केली आहे.