। रसायनी । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील देवळोली गावातील उसरण धरण भरले असून सांडव्यातून निचरा सुरू झाला आहे. या ठिकाणी बंदी असूनही पर्यटक मोठ्या संख्येने येत असल्याने पोलीस गस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी पश्चिमेस निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या या धरणांवर पनवेल तसेच आजूबाजूच्या परिसरातील पर्यटक सहलीला येतात. शनिवार, रविवार आणि इतर सुटीच्या दिवशी धरणावर येणार्यांचे प्रमाण जास्त असते; तर काही जण धरणात पोहण्यासाठी उतरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, पाण्याचा अंदाज नसल्यास पाण्यात उतरणे धोकादायक आहे. उसरण धरणात आतापर्यंत दोन-तीन जणांचा बुडून मृत्यू झाला असून, या ठिकाणी पर्यटकांना बंदी घालावी, तसेच पोलीस गस्त ठेवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.