गडकरींमुळे देशातील रस्त्यांचा विकास -पवार

। अहमदनगर । प्रतिनिधी ।
गडकरींच्या काळात देशातील रस्ते दुप्पट झाल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नमूद केले. अहमदनगरमध्ये महामार्ग प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर आले. यावेळी शरद पवार बोलत होते.

यावेळी बोलताना शरद पवारांनी गडकरींनी रस्ते वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी घेण्याच्या पूर्वी देशात 5 हजार किमीचं काम झालं होतं. गडकरींकडे जबाबदारी आल्यानंतर तोच आकडा 12 हजार किमीच्या पुढे गेला आहे, असं शरद पवार म्हणाले. यावेळी बोलताना शरद पवारांनी आपल्याला रस्त्याने प्रवास करायला आवडत असल्याचं सांगितलं. देशाच्या अनेक राज्यांमध्ये मला कामानिमित्त जावं लागतं. गाडीनं प्रवास करण्यात मला स्वत:ला आनंद मिळतो. कारण त्यामुळे रस्ते बघायला मिळतात, आजूबाजूच्या शेतातलं पीक बघायला मिळतं. म्हणून मी शक्यतो रस्त्यांनी प्रवास करण्याचा प्रयत्न करतो, असं ते म्हणाले.

देशाच्या कोणत्याही राज्यात गेल्यानंतर त्या ठिकाणचे उत्तम रस्ते बघायला मिळतात. तिथले खासदार, मंत्री, अधिकार्‍यांकडे हा विषय काढला की ते म्हणतात ही गडकरी साहेबांची कृपा आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी सत्तेचा अधिकार हातात आल्यानंतर त्याचा उपयोग देशाच्या उभारणीसाठी कसा करू शकतो, याचं उत्तम उदाहरण गडकरींनी दाखवलं आहे,


शरद पवार,राष्ट्रवादी अध्यक्ष

गडकरी विकासकाम बघतात
दरम्यान, नितीन गडकरी आपल्याकडे येणार्‍या लोकप्रतिनिधीचा पक्ष न बघता विकासकाम बघतात असं शरद पवार म्हणतात. संसदेत मी बघतो की गडकरींकडे येणार्‍या कोणत्याही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा पक्ष ते बघत नाहीत तर त्यानं आणलेलं विकासकाम काय आहे हे ते पाहतात. त्याचा परिणाम देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यात होतो, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

Exit mobile version