| महाड | वार्ताहर |
तालुका हा दरवर्षी आपत्तीच्या रडावर असतो. या कालावाधीत येथील नागरिकांना कायमच दहशतीच्या सावटाखाली राहावे लागते. आपत्तीमध्ये नागरिकांना मदत व संपर्कासाठी नगर परिषदेने आपत्ती व्यवस्थापन केंद्र सुरु केले आहे. त्यामुळे नागरिकांची सोय होणार आहे, असा विश्वास नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी व्यक्त केला.
नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील प्रशासकीय इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर हे आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्यात आले आहे. या ठिकाणी आवश्यक असलेल्या सर्व यंत्रणा उपलब्ध झाल्या असून या ठिकाणाहून महाड शहरासह तालुक्यातील येणाऱ्या आपत्ती संदर्भात नियंत्रण केले जाणार आहे.
आगामी चार महिन्यांच्या कालावधीसाठी येथे सरकारी अधिकार, कर्मचारी यांना नियुक्त केले जाणार आहे. काही दिवसांमध्येच संबंधित विभागाला त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती बाबत कळविले जाईल, असे कोळेकर यांनी स्पष्ट केले.
एकूणच महाड तालुक्यातील मागील काही वर्षात झालेल्या दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने मागील आठवड्यात घेतलेल्या प्रांताधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर नगरपरिषदमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन केंद्र 1 जून पासून सुरू करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.