यादीत नाव; मात्र, भरपाई नाही
बांद्यातील पूरग्रस्तांची व्यथा
। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
बांदा व शेर्ले येथे आलेल्या पूरपरिस्थितीत नुकसान झालेल्या पूरग्रस्तांची नुकसानग्रस्त यादीत नाव येऊनही, त्यांना अद्याप कोणतीही भरपाई मिळालेली नाही. दरम्यान, याबाबत तहसीलदार, प्रशासनाकडे भरपाई देण्यासंदर्भात वारंवार मागणी करूनही कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित नुकसानग्रस्तांनी 26 जानेवारीला येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत त्यांनी सावंतवाडी प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदन सुपूर्द केले. या वेळी श्रेया तुळसकर, गौरांग शेर्लेकर, अशोक बांदेकर, ज्योती वाघेला, भगवान पेंडुरकर आदी उपस्थित होते.
कोकणात आलेल्या महापुरामुळे विशेषतः तळ कोकणचे नुकसान सर्वाधिक प्रमाणात झाले आहे. याासंदर्भात महाराष्ट्रातून विविध प्रकारची जरी मदत मिळाली असली तरीही अनेक आपत्तीग्रस्त आजही वंचित आहेत. अशीच काहीशी स्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा व शेर्ले परिसरातील आपत्तीग्रस्तांची असून, त्यांनी याप्रसंगी वारंवार प्रशासन दरबारी तक्रारी केल्या आहेत. मात्र या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने त्यांनी प्रशासनास निवेदन दिले आहे.
या निवेदनानुसार, 22 जुलै 2021 ला झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे आमच्या दुकानातील सामानाचे व विक्रीस ठेवलेल्या साहित्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. तर घरांमध्ये सुद्धा पाणी शिरल्याने स्थानिक स्थानिकांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. याबाबत शासनाने जाहीर केलेल्या नुकसान भरपाईच्या पहिल्या यादीत आम्हाला लाभार्थ्यांची नावे होती.
मात्र दुसर्या यादीत त्यातील काही नावे वगळण्यात आली आहेत. तर नुकसानग्रस्तांना अद्याप भरपाई मिळाली नाही आहे. यासंदर्भात वेळोवेळी मागणी करून सुद्धा संबंधित प्रशासन त्याची कोणतीही दखल घेताना दिसत नाही. त्यामुळे आम्ही नुकसानग्रस्त ग्रामस्थ व व्यापारी 26 जानेवारीला उपोषण छेडण्याच्या इशार्यावर ठाम आहोत, असे म्हटले आहे.
प्रशासनाने दखल घ्यावी
शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाईची ादी पुन्हा तपासण्यात यावी. कारण पुरामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. त्यांना भरपाई मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे. भरपाई न मिळाल्यास रहिवासी आणखी अडचणीत येतील. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी या वेळी पूरबाधितांनी प्रशासनाकडे केली.