। पनवेल । वार्ताहर ।
एका बाजूला हर घर नल से जल म्हणत शासनाने जल जीवन मिशन ह्या महत्वकांक्षी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीस शुद्ध पाणी देण्याची घोषणा केली असताना दुसरीकडे मात्र राज्यात आजही अनेक गावे आणि वाड्या-वस्त्या दूषित पाणी पीत असल्याने शासनाची ही योजना कागदावरच असल्याचे स्पष्ट होत आहे. पनवेल तालुक्यतील ग्रुप ग्रामपंचायत गुळसुंदे हद्दीतील तीन महसुली गावे व चार आदिवासी वाड्यांतील सुमारे नऊ हजार नागरिकांना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने पुरविण्यात येणारे पाणी हे पिण्यायोग्य नसल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.
ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने या पाण्याचे नमुने शासकीय प्रयोगशाळेत तपासले असता सदर पाणी पिण्यायोग्य नसल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे मात्र असे असतानाही ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता व ग्रामपंचायत गुळसुंदेचे सरपंच याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप येथील महिलांनी केला आहे. याबाबत लाडीवली येथील ग्रामस्थांनी पाठपुरावा करून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 1 कोटी 20 लाख रुपये निधी मंजूर होऊन तसदर कामाचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतीने एमआयडीसीकडून पाण्याचे उद्भव स्त्रोत घेणे आवश्यक असताना ग्रामपंचायती कडून याबाबत टाळाटाळ होत असल्याने 1 कोटी वीस लाख एवढा निधी उपलब्ध असतानाही जल जीवन मिशन मधील योजना कागदावरच आहे ही योजना कार्यान्वित होत नसल्याने येथील नागरिकांमध्ये तीव्र संताप असल्याचे लाडीवली येथील विजया मांडवकर, सुरेखा वाघे, नीता कालेकर या महिला ग्रामस्थांनी सांगितले आहे.
दरम्यान पातळगंगा एमआयडीसी क्षेत्रात असलेल्या गुळसुंदे ग्रामपंचायती मधील लाडीवली, आकुलवाडी, व गुळसुंदे या महसुली गावांसह डोंगरीची वाडी, लाडीवली स्टेशनवाडी, फलाटवाडी, चिंचेचीवाडी ह्या आदिवासी वाड्यांतील नागरिकांना मागील 10 ते 12 वर्षांपासून रायगड जिल्हा परिषदेच्या सुमारे 52 वर्ष जुन्या व नादुरुस्त व बंद पडलेल्या चावणे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे पाताळगंगा नदीतील प्रदूषित पाणी कोणत्याही जलशुद्धीकरण प्रक्रियेविणा पुरवठा केला जातो तोही आठवड्यातून एक ते दोन वेळा फक्त अर्धा तास असेही येथील आदिवासी ग्रामस्थानचे म्हणणे आहे.