। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
श्री रामकृष्ण विवेकानंद सेवा समिती, अलिबागतर्फे परिसरातील आदिवासी वाड्यांवर मच्छरदाण्यांचे वाटप नुकतेच करण्यात आले. आरसीएफच्या निगमित सामाजिक दायित्वांतर्गत या मच्छरदाण्या सेवा समितीकडे सुपूर्त करण्यात आल्या होत्या.
दरवर्षी पावसाळ्यात आदिवासी बांधवांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच पावसाळ्यात होत असलेल्या डासांच्या प्रादुर्भावामुळे काही आजारांची लागण होण्याचीही शक्यता असते. हे टाळण्यासाठी आदिवासी बांधवांना काही आवश्यक वस्तु देण्याच्या दृष्टीने सेवा समितीतर्फे आरसीएफकडे मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आरसीएफद्वारे कंपांनीच्या निगमित सामाजिक दायित्वांतर्गत सुमारे 500 मच्छरदाण्या सेवा समितीकडे देण्यात आल्या. एचआयएल कंपनीचे उत्पादन असलेल्या या विशेष मच्छरदाण्यांवर डास प्रतिबंधक रसायनाचा लेप आहे.
अलिबाग जवळील सहाणवाडी, भेरसेवाडी, मठवाडी, दिवीवाडी, राजेवाडी आणि कुसुंबळेवाडी या आदिवासी वाड्यांवरील सुमारे पाचशे कुटुंबांना या मच्छरदाण्याचे वाटप सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी केले. याप्रसंगी आरसीएफ जनसंपर्क विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रमोद देशमुख व अधिकारी संतोष वझे तर सेवा समितीचे सचिव भालचन्द्र देशपांडे, सहसचिव शशिकांत फाटक, दिनेश माळी उपस्थित होते.