मा. राज्यमंत्री स्व. मीनाक्षीताई वक्तृत्व करंडक 2025
| रायगड । प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या, माजी राज्यमंत्री स्व. मीनाक्षी पाटील यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (दि.13) अलिबागमध्ये शेतकरी भवन येथे जिल्हास्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असून या स्पर्धेसाठी 45 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. विजेत्यांना मा. राज्यमंत्री स्व. मीनाक्षीताई वक्तृत्व करंडक 2025 देऊन गौरविण्यात येणार आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या स्व. मीनाक्षी पाटील यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान राहिले आहे. विधानसभेत आमदारपासून ते राज्यमंत्री म्हणून त्यांनी सक्षमपणे भूमिका बजावली आहे. आपल्या वकृत्वाने सभागृहाला हालविण्याची आणि सरकारला प्रश्नांची सोडवूक करण्यासाठी भाग पाडण्यात त्यांचा एक वेगळा हातखंडा होता. उत्तम वक्त्या तसेच संसदपट्टू म्हणून त्यांची ख्याती होती. रायगडच्या नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्राच्या झुंजार नेत्या होत्या. स्वतःच्या दुखापेक्षा समाजाचे दुःख मोठे आहे, हे ताईंनी ओळखून आपले सारे जीवन तमाम शेतकरी, कामगारांसाठी समर्पित केले. वैयक्तिक जीवनाच्या सुख दुःखाशी समरस कसे व्हावे. कौटूंबिक नाते, जिव्हाळ्याचे व ऋणानुबंधाचे संबंध कशा पध्दतीने जपावे याचा आदर्श ताईंच्या माध्यमातून प्रत्येकाने घेण्यासारखा होता. राजकीय, सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात त्यांची कामगिरी मोलाची राहिली आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण राहवे, यासाठी शेकापच्या वतीने त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा स्तरिय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी विद्यार्थी संघटना अलिबाग, पुरोगामी युवक संघटना अलिबाग, शेकाप सांस्कृतिक सेल अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने मा. राज्यमंत्री स्व. मीनाक्षीताई वक्तृत्व करंडक 2025 वक्तृत्व स्पर्धा 13 सप्टेंबरला होणार आहे.
स्थानिक प्रश्नांचे राज्यस्तरिय नेतृत्व-मीनाक्षीताई पाटील, येवा कोकण आपलोच असा- पण विकासाचं काय?, सावित्रीच्या लेकी चालल्या पुढे, संघर्षातून आत्मनिर्भरतेकडे, नफरत के बाजार मे मोहोब्बत बेच रहा हूं मै, सकारात्मक बदलाची सुरुवात- व्यक्तीच्या प्रयत्नातून समाजापर्यंत, रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला रोख 11 हजार रुपये व चषक, द्वीतीय क्रमांकाला रोख आठ हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांकाला रोख पाच हजार रुपये व चषक, चतुर्थ क्रमांकाला रोख तीन हजार रुपये व चषक तसेच पंचम क्रमांकाला रोख दोन हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येकी एक हजार रुपये व चषक अशी पाच उत्तेजनार्थ बक्षीसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेसाठी 45 स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात असून शनिवारी (दि.13) स्व. मीनाक्षी पाटील यांची जयंती आहे. या जयंतीच्या निमित्ताने अलिबागमध्ये वक्तृत्व स्पर्धा होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
