मार्चअखेर 30 टक्के कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्ह्यातील महसुली गावांना हागणदारीमुक्त अधिकचा दर्जा देण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेची धडपड सुरु आहे. 1832 गावांपैकी 1321 कामे पूर्ण झाली असून, 31 कामे शिल्लक आहेत. आतापर्यंत 1290 गावांना ‘ओडीएफ प्लस’चा दर्जा देण्यात आला असला तरी, अद्याप 105 कामे सुरुच झाली नाहीत. मार्चअखेर 30 टक्के कामे पूर्ण करुन जिल्हा 100 ओडीएफ प्लस करण्याचे जिल्हा परिषदेपुढे आव्हान कायम आहे. त्यामुळे जिल्हा या योजनेत ‘प्लस’ होणार की ‘मायनस’, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे पूर्ण झालेल्या व हागणदारीमुक्त झाल्याचे निकष पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यातील गावांना ‘ओडीएफ पल्स’चा दर्जा देण्यात येत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-2 ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात गाव हागणदारीमुक्त करण्यावर भर देण्यात आला होता. यात प्रामुख्याने वैयक्तिक शौचालय बांधकामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली. 2019 मध्ये देश हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आला.
ओडीएफ प्लस ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यामध्ये वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्तरावरील स्वच्छतेची कामे करण्यात येत आहेत. प्रत्येक गावामध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करणे, सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम करणे यासारखी कामे करण्यात येत आहेत. उदयमान, उज्ज्वल व उत्कृष्ट असे ओडीएफ प्लसचेे तीन प्रकार आहेत. जिल्ह्यातील कर्जत, खालापूर आणि तळा तालुक्यात आतापर्यंत 100 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे त्यांना ‘ओडीएफ प्लस’चा दर्जा देण्यात आला आहे. अद्यापही 542 गावे ओडीएफ प्लस होणे बाकी आहे. 407 कामे प्रगतीपथावर आहेत.
50 टक्क्यांपेक्षा कमी कामे झालेले तालुके कर्जत, खालापूर आणि तळा या तीनच तालुक्यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे, तर उरण तालुका 98 टक्के आणि सुधागड तालुका हा 97 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. मात्र, अद्यापही काही तालुके हे मागे पडले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने श्रीवर्धन 50 टक्के, पेण 49 टक्के, मुरुड 37 टक्के, म्हसळा 45 टक्क्यांचा समावेश आहे.
50 टक्के ते 75 टक्क्यांपर्यंत कामे झालेले तालुके अलिबाग-59 टक्के, माणगाव-56 टक्के, पोलादपूर-61 टक्के, रोहा-65 टक्के, पनवले-72 टक्के आणि महाड 74 टक्के एवढी कामे पूर्ण झाली आहेत. मार्च अखेर त्यांना कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यानंतरच त्यांना ओडीएफ प्लसचा दर्जा मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
पालघर जिल्ह्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा ओडीएफ प्लस झाला आहे. रायगड जिल्हा कोकणात तिसऱ्या क्रमांकवर आणण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे. संबंधित ग्रामपंचायती आणि ग्रामस्थांनीदेखील प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.
शुभांगी नाखले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता)