पंडित पाटील यांचा कंपनीच्या प्रशासनाला इशारा
| अलिबाग | प्रतिनिधी |
नागोठणे येथील रिलायन्स कंपनीतील सांडपाणी खाडी, समुद्रात सोडले जात आहे. त्यामुळे मासेमारीवर त्याचा परिणाम होत असून, अनेक मासे मृत्युमुखी पडत आहेत. खाडी, समुद्राच्या प्रदुषणाचा फटका नागरिकांनादेखील बसण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिवाशी खेळू नका, असा सज्जड इशारा माजी आ. पंडित पाटील यांनी दिला आहे.
रायगड जिल्ह्यात वेगवेगळे प्रकल्प उभे राहिले आहेत. प्रकल्पातील प्रक्रिया केलेले पाणी सोडण्याची व्यवस्था नसल्याने ते समुद्र अथवा खाडीमध्ये सोडले जात आहे. करोडो रुपयांचे खर्च करून उभारलेल्या प्रकल्पाचे सांडपाण्यामुळे समुद्रात प्रदूषण वाढले आहे. नागोठणे येथील रिलायन्स कंपनीचे सांडपाणी सोडण्याचे पाईप जीर्ण झाले आहेत. त्या जागी नवीन पाईप टाकण्यात आले नाही. त्यामुळे खाडी व समुद्रातील प्रदूषण जीवघेणे ठरत आहे. मासेमारीवरही त्याचा परिणाम होत असल्याने मच्छिमारांवर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. मानवी आरोग्यदेखील या प्रदूषणामुळे बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हाधिकारी याकडे जाणीवपूर्वक का दुर्लक्ष करीत आहेत, असा सवाल पंडित पाटील यांनी उपस्थित केला आहे.