शेकडो श्री सदस्यांची उपस्थिती
। अलिबाग । वार्ताहर ।
पद्मश्री डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यतिथी निमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाच्यावतीने दत्त टेकडी कुरुळ येथे प्रतिष्ठानचे प्रमुख सचिन धर्माधिकारी यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून वृक्ष लागवड मोहीमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी राहुल धर्माधिकारी, स्वरूपा धर्माधिकारी, स्वराली धर्माधिकारी, अन्विता, आराध्या, अक्षरा, श्रीयन यांनीही वृक्ष लागवड केली.
यावेळी सचिन दादा धर्माधिकारी यांनी उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन करताना आंबा, कदंब, उंबर, काजू, वड, पिंपळ, आवळा, करंज यासारखी झाडे लावल्याने दरवर्षी असह्य होत जाणारे तापमान, वाढत जाणारे प्रदूषण आणि त्याच वेगाने होणारी वृक्षतोड या सर्वांवर खूप वर्षे तग धरणारी वृक्ष लागवड आणि त्याचे संवर्धन हा एक प्रभावी आणी शाश्वत मार्ग आहे. आणि त्यादृष्टीने वृक्ष लागवड, त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. तसेच नुसते झाडे लावून उपयोग नाही तर त्याची निगा राखताना त्यांना वेळीच खते, औषधे व पाणी घातले पाहिजे, असे सचिन दादा धर्माधिकारी यांनी उपस्थित सदस्यांना सांगितले.