| आविष्कार देसाई | खास प्रतिनिधी |
जिल्ह्याच्या शहरी भागांमधील नालेसफाईची 100 टक्के कामे झाल्याचा दावा जिल्हा नगरपालिका प्रशासन कार्यालयाने केला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये पडलेल्या पावसाने शहरांच्या काही भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागल्याचे दिसून आले. नालेसफाईसाठी सरकारने तब्बल दोन कोटी 13 लाख 58 हजार रुपयांचा निधी देऊ केला आहे. मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत आहे, तर दुसरीकडे स्थानिक नगरपरिषद, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामांचा पुरता बोजवारा उडाल्याचे अधोरेखित होते.
ग्रामीण भागापेक्षा शहरी भागांमध्ये लोकसंख्या कमी आहे. तसेच शहरी भागात नालेसफाईसाठी मोठ्या प्रमाणात निधी संबंधित यंत्रणेला प्राप्त होत असतो. परंतु, मुळातच नालेसफाईच्या कामांना उशिरा सुरुवात होते. पाऊस सुरु झाल्याने नाल्यांमधून पाण्याचा योग्य प्रमाणात निचरा होत नाही. तसेच नालेसफाईच्या कामांना लवकर सुरुवात केल्याने त्या नाल्यांमध्ये पुन्हा कचरा साचला जातो. त्यामुळे शहरांमध्ये पाणी साचण्याचे प्रकार घडतात, ही खरी वस्तुस्थिती आहे. आताच्या पावसातदेखील अशीच परिस्थिती असल्याचे पहायला मिळाले.
शहरातील नालेसफाई पूर्ण झालीय, मग तरीही शहरातील नाले, गटारे तुंबलेली कशी? नालेसफाई फक्त कागदावरच झाली आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. काही शहरातील नाल्यांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे, तर काही गटारे तुंबलेली आहेत. त्यामुळे शहराच्या स्वच्छतेचा व आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुख्याधिकारी आणि प्रशासनाने शहराच्या स्वच्छतेकडे गांभीर्याने पाहणे अत्यंत गरजेचे आहे.
शहरात ठिकठिकाणी अस्वच्छतेच्या साम्राज्यामुळे भविष्यात आजारांनी तोंड वर काढल्यास यास जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांमधूनच उपस्थित केला जात आहे. शहरासाठी निधी तर मिळतो; मात्र तो निधी खरोखरच स्वच्छतेच्या कामावर किती खर्च होतो, हे शहरातील अस्वच्छतेवरून दिसून येतेच. अलिबाग शहरातील नाल्यांची सफाई तसेच ठिकठिकाणी साचलेल्या कचर्याचे साम्राज्य शहरवासियांनी अनुभवले आहे. तशीच परिस्थिती उत्तर रायगड आणि दक्षिण रायगडमधील नगरपरिषद, नगरपालिका आणि नगरपंचायतींची असल्याचे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे. शहर स्वच्छतेवर भर असल्याची ओरड स्थानिक प्रशासनाकडून केली जात असली तरी शहरात अनेक ठिकाणी असलेली घाण व कचरा हे नगरपरिषद स्वच्छतेबाबत किती जागरूक आहे हे दाखवून देते.
रायगड जिल्ह्यात 292 उघडे नाले आहेत. त्यांची लांबी 159.22 किलोमीटर आहे. वादळी नाल्यांची संख्या 320 असून, त्यांची लांबी 177.32 किलोमीटर आहे. नालेसफाईलाठी सरकारने दोन कोटी 13 लाख 58 हजार रुपये संबंधित यंत्रणांना दिले आहेत. काही ठिकाणी नालेसफाई झाली आहे, तर काही ठिकाणी होणे बाकी आहे.
शाम पोशेट्टी,
जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींची संख्या 16 आहे. सर्वत्र नालेसफाईची 100 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. नालेसफाई करणे हे काम सातत्याने सुरुच असते. एखाद्या ठिकाणी नालेसफाई झाल्यानंतर तो नाला पावसाच्या पाण्यातील गाळाने पुन्ह भरु शकतो. त्या नाल्यांची सफाई काही ठिकाणी सुरु असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. पावसानंतर काही ठिकाणी नालेसफाईची कामे सुरु आहेत.
जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी