। खेड । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गा लगत असणार्या तालुक्यातील आवाशी – गुणदे – शेल्डी मार्गाच्या झालेल्या दयनीय अवस्थेमुळे वाहनचालकांना वाहने हाकताना कसरत करावी लागत आहे.
या मार्गाच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नसल्याने वाहनचालकांसह पादचार्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आवाशी, गुणदे, कुळवंडी, खोपी, शिरगाव या गावांसह पाली, कळंबस्ते मार्गे चिपळूण तालुक्याला जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे. याशिवाय 10 गावातून लोटे औद्योगिक वसाहतीत जाणारे कामगार, गुणदे येथे माध्यमिक विद्यालय येणारे विद्यार्थी तसेच गुणदे पासून जवळच्या गावातील रुग्णांनाही लोटे, खेड, चिपळूण येथे उपचारासाठी जाण्यासाठी याच मार्गाचा अवलंब करावा लागतो. रस्त्याचे मजबुतीकरण आणि रुंदीकरण व दुरुस्तीसाठी दोन वर्षांपूर्वी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्षात काम देखील सुरु झाले होते.
याच निधीतून आवाशी येथे निकृष्ट दर्जाचा पूल देखील उभारण्यात आला. मात्र त्यानंतर संबंधित ठेकेदाराने काम सोडून दिल्याने रस्त्याचे काम रखडले आहे. यामुळे मार्गाची दयनीय अवस्था झाली असून वाहन चालक यांची डोकेदुखी कायम आहे. त्यामुळे या मार्गाची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांसह वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.