मासेमारी बंदीमुळे मासळीची आवक घटली

| उरण | वार्ताहर |

खोल समुद्रातील पावसाळी 61 दिवसाच्या मासेमारी बंदीच्या आदेशानंतर मासळीची आवक घटली आहे. त्यामुळे मात्र मासळीचे भाव चांगलेच कडाडले आहेत. जिल्ह्याभरातील मासळीचे लिलाव बंद होऊन कोट्यावधींची उलाढाल ठप्प झाली आहे. आता कोळी बांधवांनी आपल्या बोटी किनारी आणून शाकारणी केली आहे.

करंजा, मोरा, रेवस, मुळेखंड, खोपटा, वशेणी गव्हाण आदि ठिकाणी बंदरावर बोटी नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये पाच हजाराहून अधिक मासेमारी नौका आहेत. त्यामध्ये काही नौका यांत्रिकी तर काही बिगर यांत्रिकी आहेत. 31 मे हा मासेमारी हंगामाचा शेवटचा दिवस होता आता पुढील दोन महिने या बोटीत किनार्‍यावर विसावल्या आहेत.

त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून न पुन्हा एकदा मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. बदलते हवामान, सांडपाण्यामुळे समुद्रात निर्माण होणारे प्रदूषण, जेली फिश असा अनेक समस्यांमुळे मासेमारीवर परिणाम होतो. त्यामुळे मासळीच्या उत्पादनात घट होते. तरीदेखील जिल्ह्यातील मच्छीमार सर्व संकटांवर मात करत मासेमारीचा व्यवसाय करत आहेत. जून महिन्यात पावसामुळे उधाणा बरोबरच वारा, वादळ मोठ्या प्रमाणात येते. मासेमारीसाठी गेलेल्या बोटी अडकून पडण्याचा धोका अधिक असतो. खोल समुद्रात मासेमारी करणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे.

मासेमारी बंदीमुळे मच्छीमारांनी नौका किनारी लावण्यास सुरुवात केली आहे. रायगड जिल्ह्यासह करंजा व मोरा या बदरांवर बोटी नांगरण्यात आल्या असून काही ठिकाणी नांगरण्याचे काम आजही सुरू आहे. अनेकांना जीवदेखील गमवावा लागतो. तसेच, पावसाळ्यात मासळी प्रजोत्पादन कालावधी असतो.

Exit mobile version