पनवेल सबस्टेशनचे काम 5 वर्षापासुन रखडलेलेच
। नवीन पनवेल । वार्ताहर ।
तालुक्यातील नेरे येथे महावितरणकडून साधारण 5 वर्षापूर्वी सबस्टेशन बांधण्यात येणार होते. मात्र कंत्राट मिळाल्यानंतर काही महिन्यातच कंत्राटदाराने आपला गाशा गुंडाळल्याने सबस्टेशनचे काम कित्येक वर्षापासुन रखडले आहे. याचा फटका आजूबाजूच्या गावांना बसत आहे. नेरे येथील सब स्टेशनसाठी महावितरणकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. त्यामुळे या भागातील नागरिक, शेतकर्यांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. आता तरी या समस्येतून मुक्तता देण्यासठी नेरे या ठिकाणी सबस्टेशन उभारावे अशी रास्त अपेक्षा व्यक्त होत आहे.
तालुक्यातील काही गावांमध्ये महावितरणचे तीन तेरा वाजले असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील विजेच्या वाढत्या मागणीमुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. नेरेमध्ये सस्बस्टेशन न झाल्यामुळे हे प्रमाण वाढत चालले असल्याचे येथील रहिवाशांंचे म्हणणे आहे. सबस्टेशनचे काम रखडल्यामुळे आजूबाजूच्या गावांवरील विजेवर त्याचा परिणाम होत आहे. 100 किलोमीटर पेक्षा अधिक विजेच्या तारा पनवेल परिसरातून वाहून नेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे वेळोवेळी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. यासाठी तालुक्यातील सुकापूर, नेरे व गव्हाण येथे सबस्टेशन उभारण्याचे महावितरणकडून ठरविण्यात आले. मात्र नेरे येथील सब स्टेशनचे काम 5 वर्षापासून रखडले आहे. दोन वेळा नेरे सबस्टेशनचे काम मंजूर होऊन देखील काम पूर्ण होत नसल्याने नेरे येथील सब स्टेशन होईल कि नाही याबद्दल साशंकता आहे.
नेरे सब स्टेशनचे काम 2016 मध्ये काम सुरु करण्यात आले. साडे तीन कोटी रुपयांचा खर्च करून या सब स्टेशनचे काम मार्च 2017 पर्यंत काम पूर्ण होणार होते. या सबस्टेशनमुळे आजूबाजूच्या 45 ते 48 गावांना याचा फायदा होणार होता. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे कमी होणार होता. सबस्टेशनचे काम सुप्रीम इन्फ्रा कंपनीला देण्यात आले होते. या सबस्टेशनमधून तीन फिडर निघणार होते. मात्र 2017 मध्ये या कंपनीने काम अर्धवट सोडल्याने सबस्टेशनचे काम रखडले. 2019 मध्ये नेरे सबस्टेशनचे काम सुदर्शन इंजिनिअरगला मिळाले. काम पूर्ण करण्याची त्याची देखील मुदत संपलेली आहे. मात्र काम पूर्ण झालेले नाही. नेरे विभागात जवळपास 20 ते 22 हजार विजेचे ग्राहक आहेत. 45 ते 48 गाव वाडयांचा यात समावेश होतो. विद्युत पुरवठा हे अंतर जवळपास 96 किमी परिसराची लाईन आहे. काही काळापासून परिसरात बालाजी सिंफनीमधून विद्युत पुरवठा केला जात आहे. हे अंतर 80 किलोमीटर लाईनचे आहे. एवढी मोठी लाईन असल्याने कुठेही काही समस्या आली तर सर्व ग्राहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. या ठिकाणाहून जवळपास दोन कोटी वीज बिल वसुली केली जाते. मात्र वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने त्याचा नाहक त्रास वीज ग्राहकाना होत आहे.
… तर विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत
नेरे परिसराचा झपाट्याने विकास होत आहे, मोठ्या प्रमाणात इमारती उभ्या राहत आहेत त्यामुळे नागरिक वास्तव्यास येत आहेत. नेरेला विद्युत उपकेंद्र झाले तर 80 किलोमीटरची लाईन आहे, त्याच्यात तीन-चार लाईन बनतील. त्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होईल.