ग्रामस्थ, शेतकरी आक्रमक; जमिनीच्या सीमा बंद करण्याचा प्रयत्न
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील वर्णे, तिघर, नांगुर्ले येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर कल्पतरू गृहनिर्माण प्रकल्पाकडून सीमा बंद केल्या जात आहेत. तेथील व्यायामशाळा इमारत संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी तोडली असून, वर्णाई देवीच्या मंदिराकडे जाणारा रस्तादेखील उद्ध्वस्त केला आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आरपारची लढाई लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
तेथील हनुमान मंदिर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पांडुरंग शिर्के आणि ॲड. राजेंद्र निगुडकर यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली. पळसदरी ग्रामपंचायतमधील वर्णे, तिघर आणि नांगुले येथील साधारणपणे 14 शेतकरी कल्पतरू गृहनिर्माण प्रकल्पाच्या सीमेलगत आहेत. वर्णे, तिघर, नांगुर्ले येथील आम्ही शेतकरी आमच्या वडिलोपार्जित जमीन कसत आहोत. येथील शेतकऱ्यांच्या चतुःसीमेवरील 14 शेतकरी असून कोणत्याच शेतकऱ्याला कोणतीही नोटीस न बजावता जमिनीची मोजणी केली जात आहे. गेली दीड वर्षे त्यांचा प्रकल्प सुरू असून, आता सीमेलगत बांधकाम करायला सुरुवात केली. तर दोनच दिवसांपूर्वी 25 ते 30 जणांचा टोलका शेताच्या बांधावर आला होता. कल्पतरू कंपनीला राजकीय आणि प्रशासकीय अभय असल्याने शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रम करू पाहात असल्याचा दावा शेतकरी पांडुरंग शिर्के यांनी केला आहे.
तेथे काही फोन आम्हाला येत असून, त्यामध्ये स्थानिक आमदार यांचे बंधू मनोहर थोरवे यांनीसुद्धा फोन करून आम्हाला दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही त्यांना सांगितले की, आमचा आणि कंपनीचा जो काही मॅटर आहे आम्ही तो पाहून घेऊ, तुम्ही त्यात लक्ष घालू नये, अशी मी त्यांना विनंती केली. तसेच रितसर सरकारी सर्वे केल्याशिवाय तुम्ही कोणत्याही प्रकारचे बांधकाम सुरू करू नका, असेही सांगितले. भविष्यात शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दादागिरी करणाऱ्या लोकांपासून धोका आहे, असे पत्रकार परिषदेत पांडुरंग शिर्के यांनी सांगितले.
यावेळी बोलताना ॲड. राजेंद्र निगुडकर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून बोलताना या अन्यायाच्या मागे आमदार थोरवे असल्याचे घणाघाती आरोप केलेले आहेत. तहसीलदार यांची जबाबदारी आहे की शेतकऱ्यांना अडचणी असतील तर त्या सोडवाव्यात, मात्र प्रशासन राजकीय दबावाखाली जर काम करत असेल, राजकीय हेतूने काम करत असेल, तर त्यांनी विचार बदलून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. कोणती अदृश्य शक्ती कंपनीच्या मागे आहे. जमीन मोजणी करून हद्द निश्चित करून काम करावे, मध्यभागी असलेल्या शेतकऱ्यांना रस्ता द्यावा. दिनेश नरे या शेतकऱ्यांना वीटभट्टी, शेतीकडे जाण्यासाठी त्यांना रस्ता लागणार आहे त्यांना रस्ता द्यावा वरणाई मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता द्यावा ही सुद्धा मागणी आम्ही लावून धरलेली आहे. अशा मागणीचे पत्र आम्ही तहसीलदार यांना 9 फेब्रुवारी रोजी दिलेला आहे. वास्तविक तहसीलदार यांनी स्थळ पाहणी करून निर्णय घेणे आवश्यक होते. आज पाऊस पडल्यास, पेरणी सुरू होऊ शकते. मात्र, तहसीलदार शेतकऱ्यांना न्याय न देता, कोणतीच कार्यवाही करीत नाहीत. त्यामुळे तहसीलदार नक्की कोणाचे आहेत, असा सवालदेखील त्यांनी केला. तर, शासकीय निधीमधून बांधण्यात आलेली व्यायामशाळा इमारत कल्पतरू कंपनीने जमीनदोस्त केलेली आहे. तरीदेखील प्रशासन मात्र ढीम्म आहे, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला.