| नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायतमधील चौधरवाडी, जांभूळवाडी, जाधववाडी या तीन आदिवासी वाड्यांचा वीज पुरवठा 15 दिवसांनी सुरळीत झाला आहे. दोन वीज रोहित्र बंद पडल्याने स्थानिक आदिवासी लोकांना विजेशिवाय राहावे लागते होते. महावितरणकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने स्थानिक आदिवासी लोकांनी कर्जतचे माजी आ. सुरेश लाड यांची भेट घेऊन आपले गार्हाणे मांडले.
चौधरवाडी आणि जाधववाडी येथे असलेले वीज रोहित्र वादळी पावसात जळून गेले होते. स्थानिक आदिवासी ग्रामस्थांनी महावितरणकडे तक्रारी केल्या, त्यात या भागात मोठ्या प्रमाणात असलेल्या फार्म हाऊसचे मालक यांच्याकडून देखील खंडित वीजपुरवठा सुरु करण्यासाठी वारंवार भेटी घेतल्या. मात्र तालुक्यात अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले आहेत, त्यामुळे मुख्य वीजपुरवठा सुरु झाला कि आदिवासी भागातील विजेचा प्रश्न सोडविला जाईल असे उत्तर देण्यात येत होते.
मात्र 15 दिवसांचे कालावधी लोटला तरी महावितरणकडून महावितरणचे कर्मचारी पोहचत नव्हते. शेवटी स्थानिक कार्यकर्ते भरत शीद आणि विलास भला यांनी ग्रामस्थांनी माजी आ. लाड यांची भेट घेऊन विजेच्या प्रश्नाकडे लक्ष घालण्याची विनंती केली. याबाबत लाड यांनी सहायक अभियंता प्रकाश देवके यांना सूचना केली आणि त्यानंतर महावितरणकडून मोग्रज ग्रामपंचायतमधील चौधरवाडी येथील 63 केव्हीए आनंदवाडी येथील 25 केव्हीए क्षमतेचे वीज रोहित्र बसवून देण्यात आले.