बांबू लागवडीतून उन्नती साधावी

नरेंद्र पाटील यांचे शेतकऱ्यांना आवाहन

| अलिबाग | प्रतिनिधी |

शेतकऱ्यांनी नैसर्गिक समतोल राखण्यासाठी बांबू लागवडीचा फायदा घ्यावा व स्वतःची आर्थिक उन्नती करुन घ्यावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र पाटील यांनी केले. अलिबाग वनपरिक्षेत्र कार्यालयातर्फे जागतिक बांबू दिवसाचे सोमवार, दि. 18 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. पाटील बोलत होते. यावेळी बांबूचे महत्त्व व लागवडीतून शाश्वत उत्पन्न याविषयी लघुकार्यशाळा पार पडली. यावेळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी बांबू लागवड करावी. त्याच्यापासून अनेक शोभेच्या वस्तू, प्रक्रिया करून वाहनांसाठी इथेनॉल निर्मिती करता येते व अनेक ठिकाणी त्याचा जन्मापासून मृत्यूपर्यंत वापर होतो, असे श्री. पाटील यांनी सांगितले. आमच्या नर्सरीमध्ये बांबूची रोपे उपलब्ध असून, त्याचा लाभ घ्यावा. तसेच आमच्या खात्यातर्फे जून महिन्यात बांबू व शेवगा रोपे शेतकऱ्यांना देण्यात आली. सध्या पाऊस सुरू असल्याने अजूनही तालुक्यातील शेतकऱ्यांना हवी असल्यास आपल्या ग्रामपंचायतीतर्फे आपण रोपांची मागणी केल्यास देण्यात येतील, असे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, बांबू लागवडीपासून ते उत्पादित साहित्य याची माहिती प्रमुख मार्गदर्शक सचिन भोईर, कृषी पर्यवेक्षक अलिबाग यांनी दिली. भारतीय कृषक समाज नवी दिल्लीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष, प्रगतिशील शेतकरी जयपाल पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात बांबूची लागवड आपल्या शेतात करताना आपली शेतजमीन त्यासाठी उपयुक्त आहे का नाही. यासाठी मातीची तपासणी आरसीएफ थळमध्ये करून घ्यावी, असा मोलाचा सल्ला दिला. बांबू लागवडीबाबत उपयुक्त सूचना व माहिती माजी ग्रामसेवक ओंकार महाले यांनी दिली. त्यांच्यासोबत रायगड जिल्हा बुरुड समाजाचे जिल्हाध्यक्ष रुपेश जामकर यांनीही आपल्या शंकेचे निरसन करून घेतलं. मानी भुते येथील शेतकरी पोलीस पाटील म्हात्रे यांनी लागवडीबाबत अनेक अडचणी सांगितल्या. त्याची समर्पक उत्तरे सचिन भोईर यांनी दिली.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप बैनाडे व वानखेडे कृषी अधिकारी अलिबाग, समाजसेवक सलीम तांडेल, कैकाडी समाजाचे अध्यक्ष शंकर हनुमान जाधव उपस्थित होते. यावेळी बांबूपासून होणारे विविध प्रकारचे वस्तूंचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.डी. तायडे, वन अधिकारी चौल यांनी केले. या कार्यक्रमास अलिबाग तालुक्यातील सर्व वनपाल, वनरक्षक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांसाठी दामिनी ॲप
शेतकऱ्यांना शेतावर जाताना व येताना अचानक पाऊस व विजा चमकू लागल्या तर त्यापासून धोका निर्माण होऊन नुकसान होते. यासाठी केंद्र सरकारने दामिनी ॲप निर्माण केला असून, त्याचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या मोबाईलवर घ्यावा, असे मार्गदर्शन श्री. पाटील यांनी केले.
Exit mobile version