पुणतांबा ग्रामसभेत पुन्हा एल्गार

ठराव मंजूर करत सरकारकडे केल्या 16 मागण्या
मागण्यांची पूर्त न झाल्यास 1 जूनपासून होणार आंदोलन

। अहमदनगर । प्रतिनिधी ।
शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवरवर सोमवारी पुणतांबा येथे विशेष ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांचे 16 ठराव मंजूर करण्यात आले असून सरकारने या मागण्यांची पूर्तता न केल्यास 1 जूनपासून धरणे आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. सरपंच धनंजय धनवटे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेत किसान क्रांती च्या बॅनरखाली शेतकरी प्रश्‍नावर आज चर्चा झाली. यावेळी शेतकर्‍यांच्या काही मागण्यांसंदर्भातील ठराव मंजूर करण्यात आले.

ग्रामसभेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावाची प्रत सरकारला पाठवून आंदोलनाचं अल्टिमेटम देण्यात आलं आहे. पुढील सात दिवसांत दखल न घेतल्यास 1 ते 5 जून या कालावधीत धरणे आंदोलन केलं जाणार आहे. तसंच 5 जूननंतर आंदोलन आणखी आक्रमक करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुणतांबा येथील शेतकर्‍यांनी संपाची हाक दिल्यानंतरच 2017 साली राज्यभरात शेतकर्‍यांचा ऐतिहासिक संप झाला होता. याच पुणतांबा गावातून आता 5 वर्षानंतर शेतकर्‍यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. राहाता तहसीलदारांना उद्या ठरावाचे निवेदन देण्यात येणार आहे. तसंच इतर ग्रामपंचायतींनी हे ठराव सरकारला पाठवावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.

ग्रामसभेत झालेले ठराव :
ऊस पिकाला एकरी 1 हजार रूपये अनुदान – शिल्लक ऊस पिकाला हेक्टरी दोन लाख रूपये ,- कांद्यासह सर्व पिकांना हमीभाव ,- कांद्याला प्रती क्विंटल पाचशे रूपये अनुदान ,- शेतकर्‍यांना दिवसा पूर्ण दाबाने वीज मिळावी, थकित वीजबिल माफ झाले पाहिजे,- कांदा आणि गव्हाची निर्यातबंदी उठवावी, सर्व पिकांना आधारभूत किंमत दिली जावी, त्यासाठी आयोगाची स्थापना करून निर्णय घ्यावा,- 2017 साली केलेल्या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, नियमित कर्ज भरणारांचे अनुदान दिले जावे,- दुधाला उसाप्रमाणे एआरपी लागू केला जावा,- दुधाला कमीतकमी 40 रूपये दर दिला जावा,- खाजगी दूध संकलन केंद्रात होणारी लूट थांबवावी,- वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास भरपाई दिली जावी,- शेतकरी आंदोलनात दाखल गुन्हे मागे घेतले जावे,- वन हक्क कायद्यानुसार आदिवासींना जमिनी नावावर करून द्याव्या

Exit mobile version