5 ते 10 मीटर अंतरावर बांधकामे सुरु, कारवाईची मागणी
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील मुशेत गाव सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. थळ येथील (आरसीएफ) प्रकल्पाच्या रेल्वे मार्गिकेजवळ सुरू असलेल्या मोठ्या बांधकामामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संजय गंगाराम सावंत यांनी यासंदर्भात आरसीएफचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक आणि रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
सावंत यांच्या तक्रारीनुसार, आरसीएफ आणि जिल्हाधिकारी रायगड यांच्या अटींनुसार रेल्वे मार्गिकेपासून कोणत्याही प्रकारचे बांधकाम किमान 30 मीटर अंतरावर असणे बंधनकारक आहे. मात्र, मुशेत येथे क्षितीज बिल्डकॉन कंपनीने एम.आर. कंपनीसाठी थेट रेल्वे मार्गिकेपासून अवघ्या 5 ते 10 मीटर अंतरावर आरएमसी प्लांट आणि इतर मोठी बांधकामे सुरू केली आहेत.
थळ आरसीएफ हा देशातील महत्त्वाचा औद्योगिक प्रकल्प मानला जातो. येथे येणारी कच्चा माल व खतांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर रेल्वेमार्गे केली जाते. अशा परिस्थितीत रेल्वे मार्गिकेजवळ अवजड यंत्रसामग्री, काँक्रीट मिक्सिंग प्लांट आणि सततची वाहनांची ये-जा सुरू असल्यास भविष्यात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रेल्वे रुळांजवळील जमिनीची हालचाल, कंपने आणि मातीची धूप यामुळे मार्गिकेच्या स्थैर्यावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. आता सर्वांचे लक्ष आरसीएफ प्रशासन आणि जिल्हा यंत्रणेच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे. नियमांचे पालन होणार की प्रभावशाली घटकांच्या दबावाखाली प्रकरण दडपले जाणार, यावरच या वादाचा पुढील प्रवास ठरणार आहे.
ग्रामपंचायतीच्या सुचना धाब्यावर
या प्रकरणात स्थानिक प्रशासनही आक्रमक झाले आहे. ग्रुपग्रामपंचायत मापगांवच्या प्रशासकाने यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. ग्रामपंचायतीने दिलेल्या माहितीनुसार, मुशेत येथील गट क्र. 111/अ/1/9 मध्ये हे बांधकाम सुरू आहे.
कामासाठी येणाऱ्या अवजड वाहनांमुळे सार्वजनिक रस्त्यांची पूर्णपणे वाट लागली असून साईडपट्ट्या खचल्या आहेत. ग्रामपंचायतीने 17 ऑक्टोबर 2025 आणि 15 डिसेंबर 2025 रोजी दोनदा नोटीस देऊनही संबंधित कंपनीने कामात कोणताही बदल केलेला नाही. ग्रामपंचायतीच्या सूचनांनंतरही काम सुरूच राहिल्याने स्थानिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
ग्रामस्थांमध्ये नाराजी
अवजड वाहनांच्या रहदारीमुळे परिसरातील सार्वजनिक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांच्या साईडपट्ट्या खचल्या असून धूळ आणि आवाजामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दैनंदिन प्रवासी यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. विकासाच्या नावाखाली आमच्या सुरक्षिततेशी खेळ केला जात आहे, असा संतप्त सूर ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
अनेक प्रश्न अनुत्तरीत
दरम्यान, या प्रकरणात संबंधित बांधकाम कंपनीची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. तसेच प्रशासनाकडूनही ठोस प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. नियम पाळले गेले आहेत का? अंतर मोजणी अधिकृतरीत्या झाली आहे का? परवानग्या कोणत्या अटींवर देण्यात आल्या? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रेल्वे मार्गिकेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत?
थळसारख्या संवेदनशील औद्योगिक परिसरात अशा प्रकारचे आरोप उघडकीस येणे ही गंभीर बाब मानली जात आहे. मोठा अपघात घडल्यानंतर हालचाल करण्याऐवजी प्रशासनाने आधीच कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.






