बेकायदेशीर नोंदी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
| अलिबाग | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील वासरंग येथील आदिवासी शेतकऱ्यांच्या दळी जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. अन्य व्यक्तींची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यात आली आहे. या बेकायदेशीर नोंदी करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आ. जयंत पाटील यांनी सभागृहात केली.
वासरंग येथील जमीन दस्तुरी भागातील सर्व्हे नं. 47 / अ / 1 क्षेत्र 270.04 या क्षेत्रातून आदिवासी शेतकऱ्यांना दळी जमिनीचे वाटप करण्यात आले. दळी क्षेत्रातील उर्वरित इतर जमीन शेतकऱ्यांना मिळावी. तसेच या जमिनीमध्ये प्रकल्पासाठी संपादित केलेली जमीन रद्द करण्यात यावी अशी मागणी स्वरदानी आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्था पेण यांनी केली आहे. याबाबत वारंवार पत्र व्यवहार करण्यात आले आहेत. मात्र शासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. या जमिनीमध्ये अतिक्रमण करण्यात आले आहे. वाटप केलेल्या जमिनीच्या क्षेत्रातील सातबारा उताऱ्यामध्ये आदिवासी शेतकऱ्यांव्यतिरिक्त अन्य शेतकऱ्यांच्या नावांची नोंद करण्यात आली आहे . प्रत्यक्षात शासनाकडून जमीन हस्तगत करताना आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. ही बाब आ. जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. या नोंदी करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी आ. जयंत पाटील यांनी विशेष उल्लेखाद्वारे केली.