कारवाई करण्यास तहसीलदारांकडून टाळाटाळ
। अलिबाग । प्रतिनिधी ।
कुर्डूस येथील गट नं. 332 मधील आठवडा बाजारच्या प्रस्तावित जागेत एका धनदांडग्याने बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून बांधकाम सुरु केले आहे. याबाबत अलिबागचे तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. मात्र, दोन महिने उलटूनही प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली नाही. कारवाई करण्यास टाळाळाटाळ होत असल्याचा आरोप कुर्डूस ग्रामस्थ व ग्रामपंचायत कमिटीने केला आहे.
कुर्डूस गावालगत गट नंबर 332 मध्ये महसूल खात्याची जमीन आहे. ही बारा गुंठे जमीन आठवडा बाजारासाठी मिळावी यासाठी ग्रामस्थ मंडळ, ग्रामपंचायत पंच कमिटीने तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला होता. त्याबाबत प्रशासनाने मागणीची दखल घेत कार्यवाहीदेखील सुरु केली. भूमीअभिलेख विभागामार्फत जमिनीची मोजणीसुद्धा करण्यात आली.
मात्र, आठवडा बाजारासाठी प्रस्तावित असलेल्या या जागेत एका धनदांडग्याने बांधकाम सुरु केले. मातीचा भराव टाकण्यात आला. आठवडा बाजाराच्या जागेत सुरु असलेल्या बांधकाम व भरावाविरोधात कुर्डूस येथील ग्रामस्थ एकवटले. गावांच्या हितासाठी होणार्या प्रकल्पाऐवजी बेकायदेशीररित्या सुुरू असलेल्या बांधकाम व भरावाविरोधात पंच कमिटीचे पदाधिकारी प्रभाकर पिंगळे, सुनील पिंगळे आदी ग्रामस्थांनी अलिबाग तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार केली. मात्र, ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून धनदांडग्यांना अभय दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या बांधकामाबाबत प्रशासन योग्य ती कार्यवाही करेल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नकाशाच्या दुरुस्तीमध्ये अफरातफर कुर्डूस येथील गट नं. 332 मधील शासकीय जागेतील नकाशाची दुरुस्ती भूमीअभिलेख कार्यालयात करण्यात आली. मात्र, या नकाशाच्या दुरुस्तीमध्ये अफरातफर करण्यात आली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 332 ऐवजी गट नं. 5 टाकण्यात आले आहे. त्यामुळे नकाशाच्या दुरुस्तीमध्ये प्रशासनाकडून अफरातफर झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
कुर्डूस गावातील प्रस्तावित आठवडा बाजारासाठी जागेची मागणी करण्यात आली. त्यानुसार आम्हाला मदत प्रशासनाकडून झाली. मात्र, या जागेत म्हात्रे नामक व्यक्तीने बांधकाम व भराव सुरु केले आहे. त्याबाबत तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली. परंतु, त्यांच्याकडून ठोस कारवाई करण्यात आली नाही. गावाच्या विकासाला अधिकार्यांकडून आडकाठी येत आहे. निवडणुकीचे कारण सांगून त्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
प्रभाकर पिंगळे, अध्यक्ष, ग्रामपंचायत कमिटी
शासनाची जमीन देण्यात आली नाही. ज्या व्यक्तीने बांधकाम केले आहे, ते अनधिकृत आहे किंवा नाही, याची पाहणी केली जाईल. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. याबाबत तक्रारदारांसमवेत बोलणे झाले आहे.
विक्रम पाटील, तहसीलदार, अलिबाग