कुणबी समाजाकडून विधवा प्रथा बंद

ऐतिहासिक निर्णयाने समाजासमोर आदर्श

। कोर्लई । वार्ताहर ।

रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा विभागातील कुणबी समाजोन्नती संघ मुरुड-जंजिरा येथील पंचक्रोशीतील नांदले, चिंचघर, उसडी-चाफेगाव, जमृतखार, सावली, मिठागर या गावांतील समाज बांधवांनी समाजात प्रचलित असलेली अनिष्ट विधवा प्रथा बंद करून ऐतिहासिक निर्णय घेतला. सर्व समाजबांधवांनी एकमताने ठराव मंजूर करून आदर्श निर्माण केला आहे.

सालाबादप्रमाणे गौरी गणपती सण व 75 व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संयुक्त सभा दि. 2 सप्टेंबर रोजी नांदले येथे संपन्न झाली. या सभेत कुणबी समाजातील सामाजिक भान जपून व कर्तव्य मानून समाजोपयोगी विकासात्मक विषयांवर चर्चा होऊन विधवा प्रथा बंद करणेसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती मुरुड यांनी पाठविलेल्या पत्राचे वाचन करून समाजात प्रचलित असलेली अनिष्ट विधवा प्रथा बंद करून ऐतिहासिक निर्णय घेतला.

ही प्रथा धार्मिक आणि भावनिक जरी असली तरी समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणे ही काळाची गरज आहे. आपला देश विज्ञान वादी व प्रगतिशील समाज म्हणून वाटचाल करीत आहे. तरी अशा महिलांना इतर महिलांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. यामुळे अशा प्रथेचे निर्मूलन व्हावे हे नक्कीच कौतुकास्पद आहे. या सभेच्या निमित्ताने समाजातील सर्व स्तरांवर या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी असे उपरोक्त समाजाच्या वतीने आवाहन करण्यात आले.

यावेळी ग्रामीण विभाग अध्यक्ष संतोष पाटील व मुंबई विभाग अध्यक्ष मंगेश पाटील, ग्रामीण सचिव सचिन पाटील तसेच मुंबई व ग्रामीण कार्यकारिणी, कार्यकर्ते, सक्रिय समाज बांधव या सभेला उपस्थित होते. या ऐतिहासिक निर्णयाचे पंचक्रोशीतील सर्व नागरिकांतून उत्स्फूर्त स्वागत होत आहे.

अनिष्ट प्रथांना फाटा
या प्रथेअंतर्गत पूर्वापार चालत असलेल्या पतीच्या निधनावेळी पत्नीच्या कपाळावरील कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे, बांगड्या फोडणे, जोडवी काढणे किंवा विधवा म्हणून हिणवणे तसेच धार्मिक कार्यक्रमात प्रवेश नाकारणे यासारख्या अनिष्ट प्रथामुळे स्त्रियांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर बंधने लादली जात आहे. या अमानवी प्रथा, परंपरा बंद करून स्त्रियांना एक व्यक्ती म्हणून अधिकार मिळावेत, असा असा ठराव सर्वानुमते ठराव मंजूर केला.

Exit mobile version