। पुणे । प्रतिनिधी ।
धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी आयोजित केले जाणारे ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ सलग 22 व्या वर्षीही शतप्रतिशत यशस्वी झाले. पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्या चार धरणांपैकी खडकवासला या धरणात 1.19 टीएमसी पाणी साठा आहे. त्यामुळे त्यातून पुण्याची तहान भागवली जाते. धूलिवंदन वा रंगपंचमी यांमुळे हे पिण्याचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून ही समाजहितकारी चळवळ 22 वर्षे राबवली जात आहे.
महाराष्ट्राला पाणी टंचाईचे संकट भेडसावत असतांना या मोहिमेला विशेष महत्त्व आहे. हिंदु जनजागृती समिती, खडकवासला ग्रामस्थ आणि समविचारी संघटना यांच्या वतीने हे अभियान 25 मार्च या दिवशी राबवण्यात आले. यावेळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी खडकवासला जलाशयाभोवती मानवी साखळी करून नागरिकांचे प्रबोधन केले आणि त्यांना धरणामध्ये उतरू दिले नाही. धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रंग खेळून जलाशयात उतरणे, हिंदु सणांच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवणे, तसेच हिंदूंना धर्मशास्त्र माहिती व्हावे यासाठी हिंदु जनजागृती समिती प्रारंभीपासून प्रबोधन करत आहे. अशाच प्रकारे रंगपंचमीच्या दिवशी म्हणजे 30 मार्चलाही हे अभियान राबवण्यात येणार आहे. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.