कागद, डिंक व शाई या साहित्याचा वापर
। उरण । वार्ताहर ।
काळानुरुप जो बदलतो तोच आजच्या जगात टिकतो. काही जुन्या परंपरा आजही काही ठिकाणी पहायला मिळत आहेत. पूर्वी नवरात्रोत्सव आला की, घरातील वडीलधारी मंडळी मातीपासून देवी बनवायचे. यातून येणार्या नव्या पिढीला नकळत कलेचे धडे घरातुनच मिळायचे. पण ते आज घडत नाही म्हणून पर्यावरण पूरक देवी ही आजकाल काळाची गरज बनली आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा केमिकलयुक्त रंगाचा वापर करून देवीच्या मूर्ती करणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक आहे. याऐवजी शाडूच्या मातीपासून किंवा कागदाच्या लगद्यापासून बनवले तर ते पर्यावरणाला पूरक ठरतील. यापासून मुर्ती बनवतांना विद्यार्थ्यांना एक वेगळाच आनंद मिळतो. यातूनच उद्याचा एखादा कलावंत, मूर्तिकारही जन्माला येऊ शकतो. हाच दृष्टिकोन ठेवून उरण कोटनाका येथील फ्रेण्डस सर्कल सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनी यावर्षी कागद, डिंक व शाईचा वापर करून देवीची देखणी अशी मूर्ती बनविली आहे. सदर मूर्ती जेजे आर्टमधील विद्यार्थी मुबंई धारावी येथील प्रेम कदम यांनी ही मूर्ती बनविली.
सदर मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर ही मूर्ती कागदी लगद्यापासून बनविली असल्याचे सांगितले की विश्वास बसत नाही. अशी ही सुबक देवीची मूर्ती बनविण्यात आलेली आहे. बदलत्या काळानुसार आमच्या मंडळनीही पर्यावरण पूरक अशी मूर्ती बनविण्याचा निर्णय घेऊन अशी मूर्त बनविण्यात आली आहे. सदर देवीची मूर्ती ही वजनांनी हलकी असून दोन माणसे सहज ती उचलू शकतात. तरी आता अशाच पर्यावरण पूरक मूर्ती बनविण्याची गरज असल्याचे मत मंडळाचे अध्यक्ष कुंदन पाटील यांनी दिली.