। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदी इशारा पातळीवर वाहत असल्याने रस्ता वाहतूक थांबविण्यात आली आहे. चोळई-पोलादपूर, बावले-महाड, इंदापूर साईनगर, महाड तालुक्यातील दासगाव, दाभोळ, तळोशी, मोहोत-भिसेवाडी, भिवघर, वाघेरी आदिवासीवाडी, कसबेशिवथर-आंबेनली, कोंडिवते, गोठे बु. तसेच पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, धामणिचीवाडी, धामण, आंबेमाची, केवनाळे, ढवळे वडघर बु., लहुळसे, मोरसोंड, खोपड, साबर, कोतवाल बु., ओंबळी, धामणदिवी या गावातींल 236 कुटूंबातील 735 नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले आहे. तसेच पावसामुळे पेण तालुक्त्यील उंबर्डे येथे झाड पडल्यामुळे तीन कच्च्या घरांचे नुकसान झाले आहे.
तसेच रेवतळे पुलावरुन पाणी वाहत असल्याने महाड दापोली रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. अलिबाग तालुक्यातील खडताळ पुलाजवळ झाड पडले होते. उशिरापर्यंत सदर झाड हटविण्यात आले असून वाहतूक सुरळीत करण्यात आले आहे. माणगाव तालुक्यातील रिळे येथे रस्त्यावर पाणी आल्याने सदर रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.





