विविध उपक्रमांचे आयोजन
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालयांमध्ये 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा, तसेच हर घर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
13 ऑगस्टला जिल्ह्यात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. यावेळी सार्वजनिक ठिकाणांसह रस्ते, पाण्याच्या टाक्या, पाणी स्त्रोत परिसर स्वच्छता, सार्वजनिक शौचालयांचा परिसर स्वच्छता करण्यात येणार आहे. स्वच्छता मोहीम अंतर्गत गावात स्वच्छता रॅली काढण्यात येणार आहे. 14 ऑगस्टला गावातील सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, चौक, बाजारपेठ, प्रमुख ठिकाणे यांची अंतिम स्वच्छता व सजावट आणि ध्वजारोहणासाठी ठिकाण निश्चित करणे. साफसफाई करण्यात येणार आहे.
15 ऑगस्टला ग्रामपंचायत कार्यालय व इतर सरकारी इमारती, अमृत सरोवर इत्यादी ठिकाणी ध्वजारोहण करण्यात येणार आहे. अभियानांतर्गत स्वच्छ सुजल गाव प्रतिज्ञा, सार्वजनिक स्वच्छता मोहीम, स्वच्छता जनजागृती उपक्रम, जलसंवर्धन करण्यात येणार आहे. मोहिमेत जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, गावागावांमधील लोकांचा सक्रीय आणि उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, महिला बचत गट, सरपंच, सदस्य तसेच शालेय विद्यार्थी, स्वयंसेवक यांचा मोहिमेत सहभाग घ्यावा व ग्रामस्थांनी स्वच्छतेशी निगडीत विविध उपक्रम राबवावेत व अभियान यशस्वी करावे, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) शुभांगी नाखले यांनी केले आहे.







