। मुंबई । प्रतिनिधी ।
रिफायनरीसारखा एखादा महत्त्वाचा प्रकल्प कोकणात होत असेल आणि त्याला स्थानिकांचा विरोध असेल तर सरकारने स्थानिकांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. हीच राष्ट्रवादी काँग्रेसची भिू्मका आहे. अशा विरोधाची नोंद राज्य सरकारने घ्यायलाच हवी, सरकारने त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे,असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शऱद पवार यांनी मुंबई येथे केले.
रत्नागिरीतल्या बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकल्पाच्या माती परीक्षणाला स्थानिकांकडून विरोध करण्यात येत आहे. याचे तीव्र पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटताना दिसत असून याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली. असे प्रकल्प सुरू करताना सरकारने स्थानिकांशी चर्चा करावी, असे ते म्हणाले. उदय सामंतांबरोबरच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बारसू रिफायनरीला विरोध करणार्या स्थानिकांविरोधात पोलिसांकडून बळाचा वापर केला जात आहे, अशी आमची तक्रार होती. त्याबाबत उदय सामंत यांनी माहिती दिली. अशा प्रकारची कोणतीही कारवाई केली जात नसल्याचं ते म्हणाले. तसेच बारसूमध्ये रिफायनरी प्रस्तावित असून सध्या येथील मातीचे परीक्षण केल्या जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यावर मी त्यांना हे काम सध्या हे थांबवून विरोधक आणि शासकीय कर्मचार्यांची बैठक घेण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी गुरुवारी बारसूमध्ये यासंदर्भात बैठक घेणार असल्याचे आश्वासन दिले, प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.