| निलंगा | वृत्तसंस्था |
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताटात जेवणारे काही राज्यातील नेते वेगवेगळी विधाने करून गैरसमज पसरवत आहेत. त्यांना पुढे करून फडणवीसच समाजात फुट पाडत आहेत, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. निलंगा येथील जाहीर सभा आटोपल्यानंतर रात्री मुक्कामी निलंगा येथे होते. औशाच्या सभेला निघण्यापूर्वीच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रत्येक प्रश्नांला उत्तर द्यायची गरज नाही. ते कामातून गेले आहेत. फडणवीस मराठ्यांच्या अंगावर किती मराठे घालणार आहेत. आम्ही शांत आहोत आम्हाला शांत राहू द्या. तुमच्या डोक्यातील विषारी विचार मराठ्यांच्या डोक्यात उतरवू नका. कितीही तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी गावगाड्यातील मराठा व ओबीसी सामाजाने एकत्र नांदायचं ठरवलं आहे. मराठा समाजावर बोलणाऱ्या नेत्यांना सांगूनही काही जण बरळत आहेत. ते त्यांच्या त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी बरळत आहेत, असेही ते म्हणाले.