आंदोलनादरम्यान शेतकऱ्याने घेतली जलसमाधी

। बुलढाणा । प्रतिनिधी ।

जळगाव जामोद तालुक्यातील आडोळ खुर्द परिसरात जिगाव प्रकल्प पुनर्वसनाच्या प्रश्नावर आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याने नदीपात्रात उडी घेऊन जलसमाधी घेतली. स्वातंत्र्यदिनी करण्यात आलेल्या आंदोलनावेळी ही घटना घडली. विनोद पवार (वय 45 वर्षे, रा. गौल खेड) असे तरुणाचे नाव असून शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत त्याचा आपत्ती बचाव व शोध पथकाने गावाकऱ्यांच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही. तसेच, पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विविध मागण्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यात वेगवेगळी आंदोलने करण्यात आली. यामध्ये नांदुरा तालुक्यात असलेल्या जिगाव प्रकल्पाजवळ पूर्णा नदी काठावर आडोळ खुर्द येथील नागरिकांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. आडोळ खुर्द या गावाचा जिगाव प्रकल्पात पुनर्वसनाच्या पहिल्या टप्प्यात समावेश होता, मात्र अजूनही त्यांना जागा आणि जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नसल्याने नागरिकांकडून हे आंदोलन करण्यात येत होतं. हे प्रतिकात्मक जलसमाधी आंदोलन करत असतानाच विनोद पवार याने पूर्णा नदी पात्रात उडी घेतली. पूर्णा नदी दुथडी भरून वाहत असल्याने आणि वेगवान जलप्रवाहमुळे आंदोलक वाहून गेला. या घटनेने उपस्थित पोलीस, यंत्रणा आणि गावाकऱ्यात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, जिगाव प्रकल्प व्यवस्थापन, संबंधित यंत्रणा यांच्या दुर्लक्षाचा हा बळी असल्याचा आरोप नातेवाईकांसह गावकऱ्यांतून होत आहे. दुसरीकडे आंदोलनानिमित्त पोलीस बंदोबस्त असताना पवार याने नदीत उडी घेतल्याने हे प्रकरण अप्रत्यक्षरित्या का होईना पोलिसांवर शेकण्याची चर्चा आहे. पोलीस व अन्य गावकऱ्यांच्या डोळ्यादेखत आंदोलनकर वाहून गेला. त्यामुळे जिल्हा प्रशासन व जिगाव प्रकल्प व्यवस्थापन, अन्य यंत्रणा हादरल्या आहेत.

Exit mobile version