सात जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
बुधवारी हरियाणातील जिंदजवळील खनौरी सीमेवर एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा दावा करत शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. भारतीय किसान युनियन नं आज हरियाणात दोन तासांच्या चक्का जामची घोषणा केली आहे. युनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंग चढूनी यांनी व्हिडिओद्वारे या निर्णयाची माहिती दिली. तसंच 23 फेब्रुवारीच्या बैठकीत पुढील रणनीती ठरविण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
आज हरियाणात चक्का जाम पंजाब-हरियाणाच्या सीमेवर शेतकरी आणि हरियाणा पोलिसांमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे. शंभू बॉर्डर आणि खनौरी सीमेवरील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. बुधवारी पंजाबच्या भटिंडा जिल्ह्यातील 22 वर्षीय तरुणाचा खनौरी सीमेवर मृत्यू झाल्याचा दावा करत शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. भारतीय किसान युनियन (चढूनी गट) आज दुपारी 12 ते 2 या वेळेत हरियाणात चक्का जाम आंदोलन करणार आहे.
आंदोलन तीव्र होण्याची शक्यता बुधवारीही शंभू सीमेवर शेतकरी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली होती. पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या होत्या. खनौरी घटनेनंतर हरियाणातही आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे. हरियाणातील शेतकरी संघटना आणि खाप पंचायतींनी 'किसान दिल्ली मोर्चा'ला आधीच पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांनी 21 फेब्रुवारीला पुन्हा दिल्लीकडं कूच करण्याची घोषणा केली होती. शंभू सीमेवरील बॅरिकेड तोडण्यासाठी अवजड मशिनही मागवण्यात आल्या होत्या. मात्र खनौरी हद्दीत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानं दिल्लीकडं कूच करण्याचा निर्णय 2 दिवस पुढं ढकलण्यात आला आहे.
7 जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंदच शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारनं 7 जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेटवर असलेली बंदी पुन्हा वाढवली. आता अंबाला, कुरुक्षेत्र, हिस्सार, फतेहाबाद, सिरसा, कैथल, जिंद या जिल्ह्यांमध्ये 23 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 पर्यंत मोबाईल इंटरनेटवर बंदी असेल, असं परिपत्रक हरियाणा सरकारनं काढलं आहे.