शेतकऱ्यांची भातशेती पाण्याखाली; संपूर्ण वर्षभराची मेहनत जमीनदोस्त
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात 16 ऑक्टोबर रोजी सरत्या पावसाने धुमाकूळ घातला. कर्जत तालुक्यात कडाव परिसरात चक्रीवादळ आले आणि त्यात भाताच्या शेतीचे मोठे नुकसान झाले. कडाव पंचक्रोशी मधील दहा गावातील शेतीचे मोठे नुकसान झाले असून, दिवाळी सण सुरु असताना शेतकरी मात्र शेतात चिखलात भाताचे पीक काढण्यात व्यस्त आहेत. दरम्यान शेतीचे 15 दिवसात पुन्हा नुकसान झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे.
कर्जत तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यामधील 90 टक्के शेतकऱ्यांची भातशेती पाण्याखाली गेली असून, संपूर्ण कापणीसाठी आलेले भात जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. वर्षातून एकदाच भाताचे पीक घेतले जाते त्यातच संपूर्ण शेतकऱ्याची वर्षभराची मेहनत ही अशी जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यातच सतत होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी शेती व्यवसायापासून दूर जायला लागला आहे. तालुक्यात सहा मे पासून सुरू झालेला पाऊस थांबायचे नाव घेत नाही. कर्जत तालुक्यात दोन दिवस वादळी वारे आणि सोबत आलेला पाऊस यामुळे भाताच्या शेतीमध्ये उभे असलेले पीक संकटात आले आहे. भाताचे पीक शेतामध्ये कोसळले असल्याने भाताची शेती करणाऱ्या बळीराजा संकटात सापडला आहे.
त्यात आता 16 ऑक्टोबर रोजी आलेल्या चक्री वादळ आणि नंतर झालेला पाऊस यामुळे कडाव परिसरातील अनेक गावातील शेतकरी संकटात आले आहेत. कडाव, नसरापूर, अंजप, या तीन ग्रामपंचायतीमध्ये चक्रीवादळ आले होते आणि त्यावेळी पिवळे सोने म्हणून पाहणारे भाताचे पीक शेतात कोसळले. भाताचे पीक पूर्ण बहरात असताना पावसाने त्यावेळी केलेली बॅटिंगमुळे आजही शेतात पाणी भरले आहे. पाणी आजही शेतात असल्याने भाताचे पीक शेतात जमिनीवर कोसळले असून, त्या भाताच्या पिकाला पाण्यात भिजल्याने मोड येण्याची शक्यता आहे. भिजलेले भाताचे पीक खराब झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
शेतकऱ्यांची दिवाळी शेतात
कडाव परिसरातील दहा गावातील शेतकरी शेतात भाताची पीक बाहेर काढण्यात व्यस्त आहेत. शेतकरी आपली दिवाळी शेतातील पाण्याने भरलेले पीक बाहेर काढण्यात व्यस्त असल्याने या शेतकऱ्यांची दिवाळी शेतात जात असल्याचे चित्र आहे. नसरापूर, सालवाड, चांदई, भातगाव, वडवली, वावळोली, कडाव, टाकवे, वंजारवाडी, अंजप या भागातील शेतकरी शेतात व्यस्त आहेत.




