| माणगाव | वार्ताहर |
पेणतर्फे तळे येथील शेतकरी सुभाष डिके यांची शेतात रचून ठेवलेली मळणी कोणत्यातरी अज्ञात कारणामुळे शुक्रवार (दि.26) रात्री जळल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी आपापल्या शेतामध्ये भाताची मळणी ठेवत असतात. तशाच पद्धतीने डिके यांनी शेतामध्ये मळणी रचून ठेवली होती. मात्र कोणत्यातरी अज्ञात कारणामुळे मळणी जळाल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळी दिवसाच्या पूर्वी भाताची मळणी जळाल्याने त्यांच्या कुटुंबाला लागणारे अन्नधान्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. डिके यांचा कुटुंबाचा शेती हा पारंपारिक व्यवसाय असून त्यांचे कुटुंब भातशेतीवरच अवलंबून असते. दरवर्षी त्यांना शेतीच्या संकटाला सामोरे जावे लागत असून गेल्या तीन वर्षात मळणी तसेच गुरांचा गोठा जळाल्याने अतोनात नुकसान होत आहे. अज्ञात कारणामुळे भातशेती व गोठे जळत असल्याने शेतकर्यांनी चिंता व्यक्त केली आहे.